Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 9 November, 2009

इफ्फी गोव्यात, तर मुंबईत 'जलसा'!

आयोजनावर लाखोंची उधळपट्टी
पणजी, दि. ८ (प्रतिनिधी): जागतिक आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य सरकारांना दिलेले खर्च कपातीचे सर्व निर्देश पायदळी तुडवून गोवा मनोरंजन संस्थेने इफ्फीनिमित्त मुंबईत परवा एका "जलशा'चे आयोजन केले आहे. दोन ऑक्टोबरच्या जलप्रकोपानंतर काणकोणमधील रहिवासी हवालदिल झालेले असताना व केंद्राकडून खर्च कपातीची सूचना आल्यानंतरही "जलसा' आयोजित करण्यात आल्याने त्यावर तीव्र टीका होऊ लागली आहे.
मंगळवार १० नोव्हेंबर रोजी जुहू मुंबईतील जे डब्ल्यू मेरियट हॉटेलमधील सॉल्ट वॉटर पूलमध्ये या जलशाचे आयोजन करण्यात आले असून संस्थेने नेमलेली "कन्सेप्ट' ही जनसंपर्क कंपनी त्याच्या आयोजनाचे काम पाहणार आहे. निविदा प्रक्रिया व्यवस्थितपणे न पाळता जनसंपर्क कंपनी म्हणून केलेली "कन्सेप्ट' ची निवड सध्या वादात अडकली असून त्याच कंपनीच्या प्रस्तावास अनुसरून "वीस वीस भारतीय चित्रपट' स्पर्धेच्या संकेतस्थळाचाही शुभारंभ मुख्यमंत्र्यांहस्ते या जलशावेळी केला जाणार आहे.
या जलशासाठी स्वतः संस्थेचे अध्यक्ष असलेले गोव्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत, राज्याचे मुख्य सचिव, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या सर्वांचा हवाई प्रवास, आरामदायी निवास व भोजनावर मिळून भरमसाठ खर्च अपेक्षित आहे. काणकोणातील पूरग्रस्तांना सध्या मिळेल ती मदत कमी अशी स्थिती असताना मात्र इप्फीनिमित्ताने सरकारचा लवाजमा सध्या "जलशा'त रमू लागला आहे.
या जलशाला नामांकित अभिनेते व अभिनेत्रींना निमंत्रित करण्यात आले असून तेथे आगामी इफ्फीसाठी त्यांना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे आमंत्रण दिले जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या कलाकारांचा पुढील तीन तीन चार चार महिन्यांचा कार्यक्रम हा अगोदरच निश्चित झालेला असतो. तथापि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना इफ्फीला अवघेच दिवस उरले असताना या सेलेब्रिटीजना निमंत्रित करण्याची बऱ्याच उशिरा आठवण झाली आहे.
संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज श्रीवास्तव यांनीच या कार्यक्रमाची संकल्पना आखली असून लाखो रुपयांची उधळपट्टी त्यावर होणार आहे. मुंबईत हा जलसा आयोजित करणे व बॉलिवूडशी संबंधितांनाच निमंत्रणे दिल्याने इतर व्यावसायिक कलाकारांच्या मनात आपल्याला दुय्यम लेखले गेल्याची भावना निर्माण होणार असून निमंत्रणे देताना झालेल्या भेदभावामुळे अनेक आघाडीचे कलाकार यंदा इफ्फीकडे पाठ फिरविण्याचीच जास्त शक्यता दिसत आहे.
गेल्यावर्षी इफ्फी काळात अख्ख्या देशाला हादरवून सोडणारा दहशतवादी हल्ला मुंबईत झाला होता व इप्फी होऊन अवघे दोन दिवस उलटले असताना माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्या निधनाबद्दल राष्ट्रीय दुखवटा जाहीर केलेला असतानाही संस्थेने श्रमपरिहार कार्यक्रम घडवून आणला होता. मात्र पत्रकारांना त्याची कुणकुण लागताच स्वखर्चाने हा कार्यक्रम आखल्याचे स्पष्टीकरण संस्थेचे अधिकारी श्रीवास्तव यांनी केले होते.
दरम्यान, संस्थेचे बरेच सदस्य केवळ ऐषआरामाच्या सुविधांचा लाभ उठविण्यासाठीच असल्याची टीका सिने सृष्टीशी संबंधित काही लोकांनी केली आहे. त्यामुळेच केंद्र सरकारचे खर्च कपातीचे निर्देश झुगारून हे लोक जलशाचे आयोजन करण्यास पुढे सरसावल्याचे सांगून राज्याचे मनोरंजन धोरण ठरविण्याची जबाबदारी मात्र ते पूर्णपणे विसरल्याचा टोलाही या मंडळीने हाणला आहे.

No comments: