Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 12 November, 2009

मोरजीत समुद्राचा रौद्र्रावतार

..किनारी भागात लाखोंची हानी
..अनेक शॅक्सची मोडतोड
..पलंगांसह सामान वाहून गेले

पेडणे,दि. ११ ( प्रतिनिधी): अचानक आलेल्या वादळामुळे व जोरदार वारा व पावसाच्या सरीने मोरजी समुद्रकिनारी भागातील शॅक्स व्यावसायिकांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे.
११ रोजी पहाटे ३.३० वाजता अचानक शांत समुद्रात वादळ निर्माण होऊन थेट लाटा किनारी भागावर धडकल्या, ज्यामुळे तेथील शॅक्स, पलंग व होड्या तसेच पर्यटकांना आकर्षित करणारे पदपूलही वाहून गेले.
मोरजी समुद्रकिनारी भागात अद्याप पर्यटक खात्याने लॉटरीद्वारे शॅक्स घालण्यासाठी परवाने दिलेले नाहीत, त्या लोकांनी अजून शॅक्स घातले नव्हते. त्यामुळे त्यांची हानी वाचली व परंतु खाजगी जमिनीत शॅक्स, रेस्टॉरन्ट घातले होते व पर्यटकांसाठी सुर्यस्नान व समुद्रस्नान करून आराम करण्यासाठी लाकडी पलंग तयार करून किनाऱ्यावर ठेवले होते. त्यातील गोपाळ शेटगांवकर (१० पलंग व गाद्या), आग्नेल डिसौजा, (१५ पलंग व गाद्या) सचिन (१० पलंग व गाद्या), सुरेश शेटगांवकर (३ पलंग व गाद्या), सद्गुरू हरमलकर (५ पलंग व गाद्या), चंद्रकांत हरमलकर (५ पलंग व गाद्या), सुदेश दाभोलकर (५ पलंग व गाद्या) येस्टू (१० पलंग व गाद्या) त्याचबरोबरच रामा नामक व्यक्तीने किनाऱ्यावर तयार कपड्यांचा स्टॉल घातला होता, तो कपड्यासह वाहून गेल्याने त्याला चाळीस हजार रुपयांचे नुकसान सोसावे लागले तर गावडेवाडा येथील विनायक राजाराम हरमलकर व चंद्रकांत हरमलकर यांच्या मासेमारीच्या जाळी वाहून गेल्याने किमान एक लाख रुपये नुकसान त्यांना सोसावे लागणार आहे.
होडीचे दोन तुकडे
गावडेवाडा किनारी भागात पर्यटकांना जलसफर करण्यासाठी एक होडी पार्क करून ठेवली होती, त्या होडीवर सतत समुद्राच्या लाटा आपटून त्या होडीचे दोन तुकडे झाले.
पदपूल कोसळले
किनारी भागात शॅक्स जवळच आकर्षक लाकडी पदपूल उभारले होते, ते कोसळून समुद्रात वाहून गेले, त्यामुळे लोकांना आर्थिक फटका बसला.
पहाटे ३.३० वाजता अचानक समुद्राचे पाणी वाढल्याची जाणीव शॅक्स व्यावसायिकांना होताच आपापले सामान वाचवण्यासाठी त्यांची सकाळी ६ पर्यंत धावपळ सुरू होती. वाहून गेलेले पलंग कुठे मिळतात की काय याचा शोध घेतला जात होता. परंतु काहीच पत्ता लागत नव्हता. त्यामुळे व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर नुकसानीची मुद्रा दिसत होती. येथील व्यावसायिक सुदेश दाभोलकर, आग्नेल, इनास यांच्याशी संपर्क साधला असता, पहाटे ३.३० नंतर अचानक वादळ व जोरदार पाऊस पडत असतानाच समुद्राचे पाणी अचानक वाढल्याने व किनारी भागात लाकडी पलंग ठेवले होते, ते काढायला वेळच मिळाला नाही असे त्यांनी सांगितले.
तेंबवाडा मोरजी येथील पारंपरिक मच्छीमारी व्यावसायिकांनाही नुकसानी सोसावी लागणार आहे.
हरमल समुद्रकिनारी भागात समुद्राचे पाणी ओहोळापर्यंत गेले. काही घरांनाही धोका निर्माण झाला, तीन ठिकाणी नारळाची झाडे कोसळली व साक्रू फर्नांडिस यांच्या होडीचीही दहा हजार रुपयांची हानी झाली आहे. हरमल किनारी भागात समुद्राचे पाणी घरापर्यंत पोचले, मात्र धोका टळला. या भागात पेडणे व हरमल पोलिस, अग्निशमन दलाचे जवान मदत कार्यात पहाटेपासून कार्यरत होते.
हरमलचे माजी सरपंच डॅनियल डिसौजा यांनी आपल्या परिसरांतील नैसर्गिक आपत्तीची माहिती पहाटे ४ वाजता पोलीस व अग्निशामक दलाला दिली.
तेंबाला धोका
मोरजीत वाळूचे तेंब आहे. त्याठिकाणी धोका कमी निर्माण झाला मात्र वाळूचे तेंब सपाटीकरण करून त्या ठिकाणी हटस् शॅक्स घातले होते. तिथपर्यंत पाणी येऊन त्या त्या व्यावसायिकांना नुकसान सोसावे लागले.
पावसाळ्यात वादळ नव्हते
पावसाळ्यात समुद्राचे पाणी एवढे वाढले नव्हते परंतु नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात वादळाने पाण्याची पातळी वाढवून निसर्गाने आपला प्रताप दाखवला. ज्याने वाळूचे तेंब सपाटीकरण केले. त्या भागात पाण्याच्या प्रवाहाने माती कातरून वाहत गेली. पुढच्या दोन दिवसांत जर अशीच परिस्थिती राहिली तर तेंब सपाट होऊन, शॅक्स कोसळल्याशिवाय राहणार नाही.
गवताची नुकसानी
भाताची मळणी करून शेतकऱ्यांनी गाईगुरांना लागणारे गवत शेतात ठेवलेले होते. पावसाने ते भिजून टाकले व शेतात पावसाचे पाणी साचल्याने नुकसानी शेतकऱ्यांना सोसावी लागली.

No comments: