Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 14 November, 2009

बेफाम खनिज वाहतुकीने उसगाव परिसरात कोंडी

फोंडा, दि.१३ (प्रतिनिधी): खनिज मालाच्या वाहतुकीच्या जोरदार प्रारंभ झाल्याने उसगाव, तिस्क, भामई आदी भागात टिप्पर ट्रकाच्या वर्दळीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. खनिजवाहू टिप्पर ट्रकाच्या वाढत्या वर्दळीमुळे वाहतूक कोंडीची समस्या भेडसावू लागली आहे. त्यातच कोठंबी, वागूस येथील खनिज मालाचे वजन करणाऱ्या काट्यामुळे भामई, पाळी, उसगाव भागातील वाहतूक कोंडीच्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिक व इतर वाहन चालक त्रस्त बनले आहेत.
उसगाव येथील म्हादई नदीवर नवीन पूल नव्हता त्यावेळी उसगाव, भामई भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. ही समस्या सोडविण्यासाठी गतवर्षी म्हादई नदीवरील चौपदरी पुलाचे उद्घाटन करण्यात आले. तरीही आजही भामई, उसगाव भागात टिप्पर ट्रकाच्या रांगा लागलेल्या दिसून येत आहेत.
पावसाळ्यानंतर खनिज उत्खननाच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला असून सांगे तालुक्यातील अनेक भागातील खनिज खाणीवरील खनिज माल धारबांदोडा, उसगाव, भामईमार्गे डिचोली तालुक्यातील मायणा, कोठंबी व इतर ठिकाणी नेण्यात येत आहे. ह्या खनिज वाहतुकीमुळे धारबांदोडा, उसगाव, तिस्क, भामई या भागातील टिप्पर ट्रकाच्या वर्दळीत वाढ झाली आहे. खनिज वाहतूक करणारे टिप्पर ट्रक जादा फेऱ्या मारण्यासाठी भरधाव वेगाने आणि बेशिस्तपणे वाहने चालवत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे.
उसगाव येथील म्हादई नदीवरील नवीन चौपदरी पुलामुळे ह्या भागातील वाहतूक कोंडीची समस्या सुटणार असा दावा केला जात होता. मात्र, सध्या भामई, उसगाव भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे हा दावा फोल ठरला आहे. आता पुलामुळे वाहतूक कोंडी होत नाही. तर कोठंबी भागातील खनिज मालाच्या वजन काट्यामुळे वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. खनिज मालाचे वजन करण्यासाठी खनिजवाहू टिप्पर ट्रक थांबविण्यात येत असल्याने त्या ठिकाणी ट्रकांची रांग लागले. शुक्रवार १३ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी खनिजवाहू ट्रकांची रांग उसगाव - तिस्कपर्यत पोहोचली होती. त्यामुळे भामई, उसगाव ह्या मार्गावरील वाहतुकीत मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाल्याने मार्गावरील वाहतूक करणाऱ्या इतर वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागला. वाहतूक कोंडीमुळे बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुध्दा त्रास सहन करावा लागला. ह्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस उपस्थित नव्हते. वाहन चालकांना आपली वाहने घेऊन वाहतूक कोंडीतून वाट काढावी लागत होती. पोलीस खात्याच्या बेजबाबदार कारभाराबद्दल लोकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती.
धारबांदोडा, तिस्क उसगाव, भामई या भागातील धूळ प्रदूषणाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. धूळ प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी अद्याप उपाय योजना हाती घेण्यात न आल्याने लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दुचाकी वाहन चालकाला वरील भागातून वाहन चालविणे धूळ प्रदूषणामुळे कठीण बनले आहे. ह्या धूळ प्रदूषणामुळे लोकांना आरोग्याची समस्या संभवते.

No comments: