Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 11 November, 2009

पाणी दरवाढ मागे

अखेर सरकार नमले : उत्तरेतील गळती बंद झाल्यावर दरवाढ
मडगाव, दि.१० (प्रतिनिधी): भाजपने केलेला कडाडून विरोध व त्या अनुषंगाने निर्माण झालेला तीव्र सामाजिक असंतोष यापुढे नमते घेऊन, घाईघाईत केलेली पाणी दरवाढ मागे घेण्याची नामुष्की आज सरकारवर ओढवली. सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना साळसुदपणाचा आव आणत उत्तर गोव्यातील पाण्याची गळती अजून बंद न झाल्याने पाण्याचे दर वाढवण्याबाबची अधिसूचना मागे घेत असल्याचे सांगितले.
या दरवाढीविरुद्ध भाजपने रस्त्यावर उतरण्याचा दिलेला इशारा व सामाजिक असंतोष तसेच तांत्रिक कारणास्तव ही अधिसूचना बेकायदा ठरण्याची निर्माण झालेली शक्यता यामुळेच ही नामुष्की सरकारवर ओढवल्याचे स्पष्ट झाले आहे.
ग्रामीण विकास खात्यातर्फे आयोजित सरस प्रदर्शनासंदर्भात आयोजित पत्रकार परिषद आटोपल्यावर पत्रकारांनी चर्चिल यांना पाण्याच्या दरवाढीबाबत छेडले असता त्यांनी मुख्य मुद्याला बगल देत आपल्याकडे हे खाते आल्यापासून राज्यातील पाणीपुरवठ्यात कशी सुधारणा झाली ते तपशिलाने सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना परत मुख्य विषयावर आणून पाण्याच्या दरवाढीचे काय, असा स्पष्ट सवाल केला असता त्याबाबत जारी केलेली अधिसूचना मागे घेण्यात येत असल्याचे व आपण त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणी केल्याचे त्यांनी जाहीर केले.
ते म्हणाले की, पाण्याचे दर वाढविण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली होती, परवा नियोजन मंडळाच्या बैठकीतही हा विषय चर्चेत आला होता. कोणीच त्यावेळी विरोध दर्शवलेला नसल्याने त्यावर आधारून अधिसूचना तयार करण्याची सूचना देण्यात आली होती. ती जारी करण्यापूर्वी आपल्याला दाखविण्याची सूचना आपण प्रधान मुख्य अभियंत्यांना केली होती. मात्र त्यांनी ती आपणास न दाखवता जारी केली व त्यातून हा घोळ निर्माण झाला.
दरवाढीची अधिसूचना जारी झाल्यामुळे ती मागे घेण्यासही काही सोपस्कार आवश्यक आहेत. ते लगेच करून ही दरवाढ मागे घेतली जाईल. अर्थात, आज ना उद्या ही वाढ करावी लागेल, ती अपरिहार्य आहे. दक्षिण गोव्यातील पाणीगळती पूर्णतः बंद झाली आहे. आपण उद्यापासून उत्तर गोव्यातील पाणीगळती बंद करण्याच्या मोहिमेवर जात आहोत. ती गळती बंद केली गेली की नवे दर अंमलात आणले जातील असे संकेत त्यांनी दिले.
एका प्रश्नावर ते म्हणाले, दक्षिण गोव्यातील ५२ टक्के पाणी पूर्वी सार्वजनिक नळांमुळे वाया जात होते . ते नळ बंद करून सदर पाण्याची बचत करण्यात आली आहे. उत्तरेतील गळती प्रक्रिया प्रकल्पांतील त्रुटींमुळे निर्माण झाली आहे. या त्रुटी दूर करून गळती थोपविली जाईल. पोर्तुगीजकालीन जलवाहिन्या हेही गळतीचे मुख्य कारण आहे. शक्य तेथे त्या बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
जर कोठे सांडपाण्याची गळती होत असेल, मग ती खासगी आस्थापने असली तरी ते खात्याच्या लक्षात आणून दिल्यास ते दोष तीन दिवसांत दूर केले जातील. नवीन बांधकामांना मलनिस्सारण जोडण्यांची सक्ती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
--------------------------------------------------------------------------
विभाजन कशासाठी
पाणी दरवाढ,मलनिस्सारण गळती यासारख्या मुद्दांचे भांडवल करून आपल्या कडील सार्वजनिक बांधकाम खात्याचे विभाजन केले जाण्याची शक्यता चर्चिल यांनी फेटाळून लावली. साळावली जलवाहिनीची नेहमीची डोकेदुखी दूर करून दक्षिण गोव्यातील पाणी समस्या आपण कायमची सोडवली असा दावा करून आता विभाजन कशासाठी, असा सवाल त्यांनी केला.
---------------------------------------------------------------------------
'पीसीं'नी चर्चिलना डावलले?
पाणी दर वाढविण्याची अधिसूचना जारी करताना प्रधान मुख्य अभियंत्यांनी (पीसी) खुद्द सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनाच डावलण्याचा प्रकार घडला आहे. चर्चिल यांनीच हा किस्सा आज येथे पत्रकारांना सांगितला अन सारेच चक्रावले. चर्चिल यांना चकवणे म्हणजे साधी बाब नव्हती; पण तो प्रकार घडलाच तसा. मंत्रिमंडळ बैठकीत या दरवाढीवर चर्चा झाली असली तरी निर्णय झाला नव्हता. त्या चर्चेच्या आधारे दरवाढीच्या अधिसूचनेचा मसुदा तयार करण्यास सांगण्यात आले होते. चर्चिल यांनी, ती अधिसूचना जारी करण्यापूर्वी आपणास दाखविण्याची सूचना पीसींना केली होती. प्रत्यक्षात पीसींनी ती चर्चिल यांना न दाखवताच जारी केली व सरकारला धर्मसंकटात लोटले."पीसीं'च्या वयोमानामुळे कदाचित त्यांना आपल्या सूचनेचा विसर पडला असावा असे चर्चिल म्हणाले.

No comments: