Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 30 May, 2008

बाबूशला मंत्रिपद मिळालेच पाहिजे

चर्चिल आलेमाव आग्रही
पणजी, दि. 29 (प्रतिनिधी) - 'कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी ताळगावचे आमदार बाबूश मोन्सेरात यांना मंत्रिपद देण्याचा जो शब्द दिला होता त्याचे पालन झालेच पाहिजे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी कोणत्या कारणांमुळे विलंब होतो आहे, याबाबतची कारणे केवळ पक्षश्रेष्ठीच देऊ शकतात' असे विधान सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांनी केले.
आज पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. दिगंबर कामत सरकार पूर्णपणे स्थिर असून ते अस्थिर असल्याचे वृत्त तथ्यहीन आहे. विश्वजित राणे व महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे आमदार हे दिगंबर कामत यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे यासंदर्भातील तथाकथित वृत्त म्हणजे हवेत मारलेल्या गोळ्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
चौपदरीकरण होणारच
राष्ट्रीय महामार्ग 17 चे पत्रादेवी ते पोळेपर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याची जबाबदारी केंद्र सरकारने राज्याला द्यावी, असा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाबाबत खासदार शांताराम नाईक व कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी उपस्थित केलेल्या हरकतींबाबत चर्चिल यांनी आश्चर्य व्यक्त केले. गेली कित्येक वर्षे हे काम करण्याची आश्वासने सरकारे देतात, परंतु आपण जर हे काम प्राधान्याने घेण्याचे ठरवले तर त्यात विरोध करण्याला अर्थच उरत नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री कामत यांना घ्यायचा असून त्यांनीच याबाबत तोडगा काढावा, असे चर्चिल म्हणाले.
मोती नव्हे ही लुईझिनची पोती...
चर्चिल यांच्या या निर्णयाला प्रदेश कॉंग्रेस कार्यकारिणी बैठकीत कार्यकारिणी सदस्य तथा माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांचे कट्टर समर्थक मोती देसाई यांनी तीव्र विरोध करून चर्चिल यांच्यावर टीका केली होती. चर्चिल यांनी मोती देसाई यांचा समाचार घेत लुईझिन फालेरो यांची पोती सांभाळणारे मोती देसाई हे सध्या त्यांच्या साहेबांकडे आमदारपद किंवा मंत्रिपद नसल्याने खवळले आहेत. केवळ वैयक्तिक असुयेपोटी त्यांच्याकडून आपल्यावर टीका होत असल्याचे चर्चिल म्हणाले.

No comments: