Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 25 May, 2008

अडवलपालवासीय रस्त्यावर खाणविरोधी आंदोलनाला तीव्र धार

साखळी, दि. 24 (प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांपासून खाणविरोधी आंदोलनाने अडवालपाल येथे रौद्ररुप धारण केले असून आता त्याची धग अन्यत्र पसरत चालली आहे.
अडवलपाल भागातील प्रत्येक घरातील लहानमोठी माणसे या आंदोलनात जिंकू किंवा मरू या निर्धाराने उतरली आहेत. त्यामुळे हे प्रकरण वर-वर दिसते तेवढे सोपे राहिलेले नाही. तसे पाहायला गेले तर खाण व्यवसाय हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे हे सर्वांनाच मान्य आहे. मात्र त्यापासून निर्माण झालेल्या समस्यांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अडवलपालवासीयांचे म्हणणे असे की, या खाण कंपन्या अशाच सुरू राहिल्या तर एक दिवस त्यांच्यावर अन्नपाण्याला मोदात होण्याची पाळी येईल. पर्यावरणाचा ऱ्हास होईल. त्यामुळे या खाणी बंद व्हाव्यात व तसे झाले नाही तर आम्ही त्याविरुद्ध प्राणपणाने लढा देऊ असे त्यांचे म्हणणे आहे. अडवालपाल भागातील शेती बागायती खाणींमुळे नेस्तनाबूत होईल. रोगराई पसरेल व आमचे संसार उघड्यावर पडतील असे नागरिक समितीच म्हणणे आहे.
रस्त्यावर उतरण्याखेरीज आमच्याकडे अन्य उपाय नाही. या गोष्टी आम्ही वेळोवेळी सरकारी अधिकाऱ्यांच्या कानावर घातल्या होत्या. पण आमच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. सरकार जागेवर आहे की नाही असा प्रश्न आम्हाला पडतो असे लोकांचे म्हणणे आहे.
बेरोजगारीचा प्रश्न खाणींमुळे सुटू शकतो, या म्हणण्यात तथ्य आहे. मात्र जेव्हा कुंपणच शेत खाऊ लागते तेव्हा आमची कैफियत मांडायची कोठे, असा सवाल लोक विचारत आहेत. खाण व्यवसाय गेली 40 वर्षे या भागात चालू होता.
मध्यंतरी काही कारणांस्तव खाणी बंद होत्या. मात्र आता मॅंगेनीजला जोरदार मागणी येऊ लागल्यामुळे खाण कंपन्यांचे लक्ष पुन्हा खाणींकडे वळले आहे. या खाणी चालवताना कायदे व नियम यांची पाय पूर्ण पायमल्ली होत आहे, असे लोकांचे म्हणणे आहे. दिवसेंदिवस ह्या खाणी लोकवस्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. येथील विहीरी झरे आटण्याच्या स्थितीत आहेत. संभाव्य धोका आम्हाला आमच्या मरणाच्या रूपाने समोर दिसत आहे. म्हणूनच आम्ही एकजुटीने ह्यावर उपाय काढण्याचे ठरवून हे आंदोलन चालू केले. मात्र हे करण्यापूर्वी सरकारी दरबारी हेलपाटे मारूनआम्हा लोकांच्या मागण्यांना कचऱ्याची टोपली दाखवण्यात आली. असे काही लोकांचे म्हणणे आहे.
हे फक्त अडवलपालपुरतेच मर्यादित नाही. गोव्याच्या कानाकोपऱ्यात या खाणींचा भस्मासूर अजूनही नाचतो आहे. अडवायला गेलो तर गप्प केले जाते. पण तशातूनही एकादी ठिणगी पेटते व आग रौद्ररूप धारण करते. हे अचानक घडलेले नाही. अनेक वर्षे धुमसणाऱ्या असंतोषाची ती परिणती आहे.
पर्यावरणप्रेमी प्रा. रमेश गावस यांनी यात स्वतःला झोकून दिले आहे. त्यामुळे आता खाण व्यवसाय सुरू करताना खाण मालकांनी आवश्यक खबरदारी घेतली पाहिजे.

No comments: