Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 30 May, 2008

पणजीचा पाणीपुरवठा आजपासून सुरळीत

मंत्री चर्चिल यांचे आश्वासन
पणजी, दि. 29 (प्रतिनिधी) - पणजीवासीयांना उद्या 30 मेपासून सुरळीत पाणीपुरवठा होणार असल्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांनी दिले. आज आल्तिनो येथील आपल्या सरकारी निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
भोम व त्यानंतर करमळी येथे जलवाहिनी फुटल्याने हे संकट ओढवले. पणजीवासीयांना गेल्या तीन ते चार दिवसांपासून पाण्याअभावी त्रास सहन करावा लागला याबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना युद्धपातळीवर कामास लावण्यात आले आहे. तसेच पुढील महिन्यापर्यंत अभियंत्यांना रजा न देण्याचे आदेशही जारी केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
साळावली धरणात मुबलक पाण्याचा साठा आहे. केवळ जलवाहिन्या फुटल्यामुळे हे पाणी लोकांपर्यंत पोहोचणे कठीण बनले आहे. दोन्ही जलवाहिन्या बदलण्याचे काम प्राधान्याने सुरू आहे. साळावली ते मडगाव व ओपा ते पणजी नवी जलवाहिनी टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहचले आहे. समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर सध्याची जलवाहिनी औद्योगिक वसाहती तथा इतर कारणांसाठी वापरली जाईल. वीज खंडित होत असल्याने त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होतो. त्यामुळे साळावली व ओपा येथे स्वतंत्र उपकेंद्र उभारून भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
पंपामध्ये बिघाड
साळावली जलशुद्धीकरण प्रकल्पात सध्या सात पंप कार्यरत आहेत. अलीकडेच तेथे किर्लोस्कर कंपनीचा नवा पंप बसवण्यात आला होता. त्यात बिघाड झाल्याने काही प्रमाणात दक्षिण गोव्याच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. हा पंप दुरुस्त केल्यानंतर पुन्हा एकदा बिघडल्याने यापुढे संबंधित कंपनीचे पंप खरेदी करू नये, असे आदेशही दिल्याचे चर्चिल यांनी सांगितले.

No comments: