Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 26 May, 2008

2004 पासून 17 वेळा कॉंग्रेस पराभूत

नवी दिल्ली, दि. 25 - केंद्रात 2004 साली संपुआ सत्तेवर आल्यानंतर गेल्या चार वर्षात कॉंग्रेसला 17 वेळा पराभवांना सामोरे जावे लागले. 25 निवडणुकांपैकी 8 वेळा कॉंग्रेसने विजय मिळविला तर 17 वेळा पराभव पत्करला, असे आकडेवारीवरून दिसून येते. लोकसभेच्या निवडणुकीच्या वर्षीच झालेल्या निवडणुकीत तीन विजय कॉंग्रेसने प्राप्त केले तर राहिलेल्या पाच विजयांमध्ये पॉंडिचरी, मणिपूर व गोवा या छोट्या राज्यांचा समावेश होतो. आंध्र प्रदेश, कर्नाटक, ओरिसा व सिक्कीम या राज्यात 2004 साली निवडणूक झाली, त्यापैकी केवळ आंध्रात कॉंग्रेसला यश मिळाले. 2005 साली कॉंग्रेसने हरयाणात सत्ता मिळविली. 2005 साली झारखंडमध्ये भाजपने सत्ता खेचून घेतली तर बिहारमध्ये त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आली. रामविलास पास्वान यांच्या हट्टामुळे तेथे पुन्हा नंतर निवडणुका घ्याव्या लागल्या. महाराष्ट्र व अरुणाचलमध्ये सत्ता टिकविण्यासाठी कॉंग्रेसला अन्य पक्षांशी हातमिळवणी करावी लागली. बंगाल व केरळमध्ये संपुआतील घटक पक्षांनीच कॉंग्रेसला धूळ चारली. कॉंग्रेसने आसाम मात्र राखले. 2007 साली झालेल्या निवडणुकीत हिमाचल, उत्तर प्रदेश व गुजरातमध्ये कॉंग्रेस सत्तेवर येऊ शकली नाही. उत्तराखंड व पंजाब ही राज्ये गमवावी लागली. त्याचवर्षी गोव्यासारख्या राज्यात सत्ता टिकविण्यासाठी कॉंग्रेसने घातलेला गोंधळ सुपरिचित आहेच. उत्तर प्रदेश व गुजरातमध्ये या पक्षाचा झालेल्या दारूण पराभवानंतर त्रिपुरा, मेघालय ही राज्यांतही या पक्षाचा पराभव झाला. चार वर्षात एकाच राज्यात दोन वेळा पराभव पत्करण्याची पाळी कर्नाटकमध्ये या पक्षावर आली आहे.

1 comment:

Anonymous said...

Great work.