Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 26 May, 2008

येडियुराप्पांकडून सत्तेचा दावा सादर

पाच अपक्षांचा पाठिंबा, उद्या शपथविधी
बंगलोर, दि. 26 - मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बी. एस. येडियुराप्पा यांची आज भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. विशेष म्हणजे, बहुमतासाठी आवश्यक असलेला 113 हा आकडा पार करीत येडियुराप्पा यांनी सायंकाळी उशिरा राजभवन गाठले आणि राज्यपाल रामेश्वर ठाकूर यांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा सादर केला. बहुमतासाठी भाजपला केवळ तीन अपक्षांची गरज असताना पाच अपक्षांनी पाठिंबा जाहीर केला. यातील दोन अपक्ष आमदार आजच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत उपस्थित होते.
उद्या मंगळवारी सत्तेसाठी दावा सादर करण्याचा भाजपचा विचार होता. पण, आवश्यक ते पाठबळ प्राप्त झाल्यानंतर येडियुराप्पा यांनी अरुण जेटली, अनंतकुमार व भाजपच्या अन्य नेत्यांसह सोमवारी सायंकाळी राज्यपालांकडे जाऊन सत्तेचा दावा सादर केला.
110 जागा जिंकणाऱ्या भाजपाला बहुमतासाठी तीन सदस्यांची गरज होती. ती आज पाच अपक्षांनी पूर्ण केली आहे. यातील दोन अपक्ष सदस्य गुलहत्ती शेखर आणि शिवराज थांगडी हे आजच्या बैठकीत उपस्थित होते.
पाच अपक्षांचा पाठिंबा
शिवराज थांगडी हे भाजपचेच सदस्य असले तरी तिकीट न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी केली आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढले. त्यांनी भाजपला पाठिंबा देऊ केला आहे. भाजपला पाठिंबा देणाऱ्या अन्य अपक्षांमध्ये डी. सुधाकर आणि नरेंद्र स्वामी यांचा समावेश आहे. आजच्या बैठकीत सुधाकर आणि नरेंद्र स्वामी उपस्थित नसले तरी त्यांनी आपला पाठिंबा पक्षाला कळविला असल्याचे समजते.
या निवडणुकीत एकूण 6 अपक्ष उमेदवार निवडून आले असून, त्यातील पाच सदस्यांनी पाठिंब्याची तयारी दर्शविल्याने भाजपाचा सत्तेचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
गुरुवारी शपथविधी
गुरुवारी 29 रोजी बी. एस. येडुयुराप्पा यांचा एकट्याचा शपथविधी होणार असून, विधानसभेत सरकारचे बहुमत सिद्ध झाल्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येईल. भाजपला पाठिंबा देणाऱ्या काही अपक्षांना मंत्रिपद देण्यात येणार असल्याचे संकेतही या नेत्याने यावेळी दिले आहेत.

सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या
भाजपच्या मतांची टक्केवारीही वाढली
बंगलोर, दि. 26 ः कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 110 जागा जिंकतानाच आपल्या मतांच्या टक्केवारीतही मागील निवडणुकीच्या तुलनेत वाढ नोंदविली आहे. या निवडणुकीत कॉंगे्रसला मिळालेल्या मतांच्या प्रमाणात मात्र घट झाली आहे. 2004 मधील निवडणुकीतही भाजपाने कॉंगे्रसपेक्षा जास्त जागा घेतल्या होत्या.
गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपला या निवडणुकीत 5.3 टक्के मते जास्त मिळाली असून, या मतांच्या आधारावर भाजपचे 31 उमेदवार विधानसभेवर निवडून गेले आहेत. मतांचे प्रमाण वाढल्यानेच भाजपला बहुमताच्या जवळ जाता आले. निवडणूक आयोगाने आज मतांची आकडेवारी जाहीर केली. यातून ही बाब समोर आली आहे.
भाजपच्या तुलनेत कॉंगे्रसला या निवडणुकीत मिळालेल्या मतांचे प्रमाण किंचित जास्त असले तरी कॉंगे्रसला या जास्त मतांचे रूपांतर जागा वाढण्यात करता आले नाही आणि तसेही या पक्षासाठी ही बाब मुळीच नवीन नाही. भाजपचे मात्र तसे नाही. या पक्षाने आपल्या मतांच्या टक्केवारीत सातत्याने वाढ करताना जागाही वाढविल्या आहेत. 2004 आणि 2008 या दोन्ही निवडणुकीत ही बाब स्पष्ट झाली आहे.
राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने 33.8 टक्के इतक्या मतांच्या बळावर 110 जागा जिंकल्या आणि सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून उदयास आला. गेल्या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या मतांचे प्रमाण 28.5 टक्के होते. त्या स्थितीतही भाजप 79 जागा जिंकून आघाडीवर होती. याचाच अर्थ, पाच वर्षांत भाजपने आपल्या मतांचे प्रमाण 5.3 टक्क्यांनी वाढविले आहे. तिथेच, 34.5 टक्के मते मिळवूनही कॉंगे्रसला 80 जागांच्या वर जाता आले नाही. गेल्या निवडणुकीत कॉंगे्रस पक्षाला 35.3 टक्के मते मिळाली होती. त्यावेळी या पक्षाला केवळ 65 जागा मिळाल्या होत्या. यावेळी 34.5 टक्के मते प्राप्त करताना कॉंगे्रसने आपल्या जागांची संख्या 15 ने वाढविली आहे, एवढीच या पक्षाची जमेची बाजू आहे. तथापि, गेल्या निवडणुकीच्या तुलनेत कॉंगे्रसच्या मतांचे प्रमाण या निवडणुकीत कमी झाले आहे.
जदएसचे मात्र या निवडणुकीत प्रचंड नुकसान झाले आहे. 1.4 टक्के नकारात्मक मतांनी या पक्षाच्या सदस्यांची संख्या गेल्या निवडणुकीतील 58 वरून 28 पर्यंत खाली आली आहे.

No comments: