Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 28 May, 2008

शेतकरी अजूनही भरपाईच्या प्रतीक्षेत

पणजी, दि. 27 (प्रतिनिधी) - मॉन्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची तात्काळ भरपाई देण्याची घोषणा सरकारने विधानसभेत केली खरी, परंतु आता तीन महिने उलटले तरी या हानीची झळ पोहोचलेल्या शेतकऱ्यांच्या हातात एक पैसुद्धा पडलेली नाही. त्यामुळे सरकारने आपली क्रूर थट्टा चालवली आहे, अशी शेतकऱ्यांची भावना झाली आहे.
सरकारच्या आदेशानुसार 25 एप्रिलपर्यंत आलेल्या अर्जांची छाननी करून सुमारे 2266 शेतकऱ्यांचे अंदाजे 2 कोटी 75 लाख रुपयांचे दावे सरकारला पाठवले आहेत. उर्वरित दोन हजार अर्जांची छाननी सुरू आहे. अवेळी पडलेल्या या पावसामुळे राज्यभरात सुमारे पाच कोटी रुपयांची हानी झाल्याचे प्राथमिक अंदाजावरून स्पष्ट झाल्याची माहिती कृषी संचालक संतोष तेंडुलकर यांनी दिली. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष नुकसान भरपाई देण्याचा निर्णय सरकारने घ्यायचा आहे. ही भरपाई कोणत्या प्रकारे द्यायची हे सरकारवर अवलंबून आहे. कृषी खात्यातर्फे पाठवण्यात आलेल्या दाव्यांबाबत सरकार नक्की काय निर्णय घेते याची वाट आम्ही पाहात आहोत," असेही तेंडुलकर यांनी सांगितले.
राज्यात अचानक कोसळलेल्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. काजू, मिरची, कांदा, हळसांदे, वाल, शेंगदाणा, आंबा, कलिंगड आदी उत्पादनाला या पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. बहुतेक किनारी भागात या उत्पादनांची लागवड होते. काही ठिकाणी वायंगण शेतीत पाणी भरल्याने भाताचेही नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सांगे, केपे, पेडणे व काणकोण तालुक्यांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे पहिल्या अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यात सत्तरी-99, सांगे-259, केपे-310, पेडणे-588, मडगाव-71, फोंडा-235, तिसवाडी-81, डिचोली-48 व काणकोण-211 शेतकऱ्यांचा समावेश आहे. उर्वरित दोन हजार अर्जांची छाननी करून दुसऱ्या टप्प्यातील अहवाल 1 जूनपूर्वी सरकारला सादर केला जाईल, अशी माहिती तेंडुलकर यांनी दिली.
भरवसा ठेवायचा कुणावर?
राज्यातील वरिष्ठ अधिकारी मे महिन्यातीस सुट्टीची मजा मारत आहेत. मंत्रिमंडळातील बहुतांश मंत्री विदेश दौऱ्यांत व्यस्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा विचार करायला सरकारकडे वेळ आहे की नाही, असा मूलभूत प्रश्न निर्माण झाला आहे. उन्हाळ्यात मिरची, कांदा, हळसांदे, आंबा या पिकांद्वारे लग्नसमारंभ व मुलांच्या शाळेचा खर्च उचलला जातो. यंदा परिश्रमपूर्वक तयार केलेले पीक पावसाने वाहून नेले व सरकारने भरपाई देण्याची घोषणाही हवेत विरली. सरकार गरिबांच्या नावाने केवळ घोषणा करते, परंतु प्रत्यक्षात त्यांच्या तोंडाला पाने पुसली जातात हा पूर्वानुभव आहे. आता तर गरिबांना दैवही साथ देत नसल्याने आम्ही कोणावर भरवसा ठेवायचा, असा काळजाला हात घालणारा सवाल बळिराजाने केला आहे.

No comments: