Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 26 May, 2008

कर्नाटकात भाजपकडे सत्ता

यडियुराप्पांचा मुख्यमंत्रिपदी 28 रोजी शपथविधी
तीन अपक्षांचा पाठिंबा
भाजपचा दक्षिण दिग्विजय
110 जागा स्वबळावर जिंकल्या
विश्वासघातकी जदएसचा सफाया
कॉंगे्रस 80 जागांवर विजयी
कॉंगे्रसकडून भाजपचे अभिनंदन

बंगलोर, दि.25 - सेक्युलर जनता दलाच्या राजकीय "दगाबाजी'ला भाजपने आज लोकशाहीच्या मार्गाने सडेतोड उत्तर दिले. कर्नाटक विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीत स्वबळावर 110 जागा जिंकून भाजपने दक्षिणेकडील राजकीय महत्त्वाच्या या राज्यातील सत्तेचे दार उघडले. स्वबळावर दक्षिणेत सत्ता खेचून आणण्याची भाजपाची ही पहिलीच वेळ आहे, हे येथे उल्लेखनीय.
बुधवार, दि. 28 रोजी बी. एच. येदीयुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार सत्तारूढ होणार आहे. राजकीय दगाबाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जदएसचा या निवडणुकीत सफाया झाला. या पक्षाला केवळ 28 जागांवरच विजय मिळविता आला असून, कॉंगे्रस पक्ष 80 जागा जिंकून दुसऱ्या स्थानावर राहिला आहे. अन्य आणि अपक्षांना 6 जागा मिळाल्या आहेत. दरम्यान, कॉंगे्रस आणि जदएसने पराभव मान्य केला असून, कॉंगे्रसने भाजपाचे नेत्रदीपक विजयासाठी अभिनंदन केले आहे.
भाजपा विधिमंडळ पक्षाची उद्या बैठक बोलावण्यात आली असून, निवडणुकीपूर्वीच जाहीर करण्यात आलेले पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार येदीयुरप्पा यांच्या नेतेपदी निवडीवर या बैठकीत औपचारिक शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.
224 सदस्यीय विधानसभा निवडणुकीसाठी 10, 16 आणि 22 मे अशा तीन टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात आले होते. जदएसला दगाबाजीची आणि कॉंगे्रसला संधीसाधू राजकारणाची शिक्षा करायची याच इराद्याने मतदार मतदानासाठी घराबाहेर पडले असल्याचे चित्र तिन्ही टप्प्यांमधील जनमत चाचण्यांनी रेखाटले होते. जनमत चाचण्यांचा हा अंदाज आज पूर्णपणे खरा ठरला. 110 ते 112 जागा जिंकून भाजपा सत्तेवर येईल, असा अंदाज सर्वच सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला होता आणि अपेक्षित असेच घडले. मावळत्या विधानसभेत भाजपाने 79, कॉंगे्रसने 65 आणि जदएसने 58 जागा जिंकल्या होत्या. त्यावेळीही भाजपा सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून उदयास आला होता. यावेळीही 110 जागा जिंकून भाजपाच अव्वल ठरला आहे. तर, कॉंगे्रसनेही आपल्या जागांमध्ये वाढ केली आहे.
भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर कुणाशीही युती करून सरकार स्थापन करणार नाही, असे भाजपाने आधीच स्पष्ट केले होते. प्रसंगी आम्ही विरोधी बाकावर बसू. पण, सत्तेसाठी वाटाघाटी करणार नाही, असा निर्धार करणाऱ्या भाजपाने कर्नाटक स्वबळावर जिंकत कॉंगे्रस आणि जदएसचे एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याचे कुटील षडयंत्रही हाणून पाडले आहे.
पहिला निकाल भाजपच्याच पारड्यात
निवडणुकीचे कल भाजपाला बहुमताकडे नेत असतानाच जाहीर झालेला पहिला निकाल देखील भाजपाच्याच बाजूने लागला होता. या काळात कधी कॉंगे्रस तर कधी भाजपाची सरशी होत होती. पण, पहिल्या निकालानंतर लागणारे बहुतांश निकाल भाजपाच्या उमेदवारांना विजयी करणारेच होते.
भाजप कार्यालयात जल्लोष
मतमोजणीचा कल भाजपकडे बहुमत देऊन गेला तेव्हापासूनच भाजपच्या बंगलोर येथील कार्यालयात आणि दिल्ली येथील मुख्यालयात आनंदाचे वातावरण होते. दोन्ही ठिकाणी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून आणि मिठाई वाटून विजयाचा जल्लोष साजरा केला. ढोल आणि नगारे वाजवून कार्यकर्ते बेधूंद नाचत असल्याचे चित्र होते. गुलाल उधळत भाजपाचे कार्यकर्ते आणि नेते परस्परांचे अभिनंदन करीत होते.
कॉंगे्रसकडून भाजपाचे अभिनंदन
जनाधार मान्य करताना कॉंगे्रसने एकीकडे पराभव तर मान्य केलाच. पण, त्याचवेळी भाजपाचे विजयासाठी अभिनंदनही केले. कर्नाटक निवडणुकीतील जनाधार भाजपासाठीच आहे. आम्ही तो स्वीकारला असून, प्रमुख विरोधी पक्ष म्हणून आपली जबाबदारी पार पाडू, असे कॉंगे्रसने म्हटले आहे.
कॉंगे्रसच्या बंगलोर येथील कार्यालयात आणि दिल्लीतील मुख्यालयात शुकशुकाट दिसत होता. 80 जागा जिंकून हा पक्ष दुसऱ्या स्थानावर राहिला असला तरी विजयाचे स्वप्न अपूर्ण राहिल्याने पक्ष कार्यकर्ते आणि नेते निराश झाले होते.
"डिलिमिटेशन'ने कॉंगे्रसला "लिमिटेड' केले
"डिलिमिटेशन' अर्थातच मतदारसंघ फेररचनेंतर्गत देशात पहिली निवडणूक कर्नाटकात घेण्यात आली होती. या निवडणुकीने कर्नाटकमधील सत्ता भाजपाच्या हाती देताना कॉंगे्रसच्या "राजकीय लिमिटेशन' निश्चित केल्या आहेत. अल्पसंख्यकांच्या गठ्ठा मतांवर डोळा ठेवून त्यांना गरजेनुसार खुश करणाऱ्या या पक्षाला कर्नाटकमधील मतदारांनी धडा शिकविला आहे. याच वर्षी आणखी पाच राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होत असून, तेथील मतदारही कॉंगे्रसला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
28 रोजी शपथविधी
भाजपाचे दक्षिणेमधील पहिलेच सरकार येत्या 28 मे रोजी आरूढ होणार आहे. बी. एस.येदीयुरप्पा हेच मुख्यमंत्री राहणार आहेत.
या निवडणुकीत सात अपक्ष उमेदवार निवडून आले असून, त्यातील चार अपक्ष उमेदवारांनी भाजपाला आधीच आपला पाठिंबा जाहीर केला असल्याने कोणत्याही राजकीय पक्षासोबत युती करण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही, असे पक्षसूत्रांनी सांगितले.
...
भाजपा विधिमंडळ पक्षाची आज बैठक
भाजपा विधिमंडळ पक्षाची उद्या, सोमवारी बैठक बोलावण्यात आली आहे. संध्याकाळी चार वाजता होणाऱ्या या बैठकीत विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला जाणार आहे.
भाजपाने आधीच माजी मुख्यमंत्री बी. एस. येदीयुरप्पा यांना विधिमंडळ पक्षाचा नेता जाहीर केले आहे. त्यामुळे त्यांच्या निवडीवर औपचारिक शिक्कामोर्तब या बैठकीत होणार असल्याचे पक्ष सूत्रांनी सांगितले.
भाजपाच्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांसह अनेक ज्येष्ठ नेते या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. यात कर्नाटक विजयाची यशस्वी रणनीती आखणारे अरुण जेटली यांचीही उपस्थिती राहणार आहे.
लोकसभेतही भाजपाच आघाडीवर राहील : जेटली
नवी दिल्ली, दि.25 ः कर्नाटकमधील विजय म्हणजे लोकसभेतील भाजपाच्या विजयाची नांदीच आहे. विजयाची ही आघाडी आम्ही लोकसभा निवडणुकीपर्यंत कायम ठेवू, असे भाजपाचे सरचिटणीस अरुण जेटली यांनी सांगितले.
दक्षिणेकडील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या राज्यात भाजपाने स्वबळावर बहुमत प्राप्त करणे याचाच अर्थ, आगामी लोकसभा निवडणुकीतही भाजपाच आघाडीचा पक्ष म्हणून कायम राहणार आहे, असा होतो. ही निवडणूक केंद्रातील कॉंगे्रसप्रणित संपुआ सरकारसाठी सार्वमतच होते. कर्नाटकमधील मतदारांनी भाजपाला सकारात्मक मते देऊन कॉंगे्रस आणि जदएसच्या संधीसाधू आणि स्वार्थी राजकारणाला झिडकारले आहे. वाढती महागाई, शेतकऱ्यांच्या समस्या आणि दहशतवादाशी लढा देण्याची संपुआ सरकारची असमर्थता या मुद्यांची निवडणुकीत महत्त्वाची भूमिका राहिली आहे. काही स्थानिक मुद्देही कॉंगे्रस आणि जदएसच्या पराभवासाठी कारणीभूत ठरले आहेत, असे जेटली यांनी पत्रकारांना सांगितले.
जदएससाठी राजकीय विश्वासघाताचा खेळ महागात पडला. वारंवार विश्वासघात करण्याची मोठी किंमत या पक्षाला चुकवावी लागली आहे. 20 महिने सत्ता भोगल्यानंतर जेव्हा भाजपाची वेळ आली तेव्हा या पक्षाने युती संपुष्टात आणून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली. जातीच्या आधारावर आपण पुन्हा सहजपणे सत्तेवर येऊ, असा या पक्षाचा अंदाज होता. पण, तो चुकीचा ठरला, असे ते म्हणाले.
कॉंगे्रसविषयी बोलताना जेटली यांनी सांगितले की, या पक्षाकडे नेता तर नाहीच शिवाय, मुद्देही नाहीत. सोनिया गांधी आणि पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या प्रचारसभांना लोकांची उपस्थिती तुरळक अशीच होती.

No comments: