Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 29 May, 2008

पणजीत तीव्र पाणीटंचाई

लोक संतापले; जादा टॅंकरकामी पर्रीकरांचा पुढाकार
केवळ चार टॅंकर्स उपलब्ध
मुख्य जलवाहिनी फुटली
आज पाणीपुरवठा सुरळीत
होण्याचा निर्वाळा

पणजी, दि. 28 (प्रतिनिधी) - भोम व करमळी येथे मुख्य जलवाहिनी फुटल्याने पणजी शहराबरोबर संपूर्ण तिसवाडी शहरात गेल्या चार दिवसापासून पाणीपुरवठा खंडित झाल्यामुळे लोकांचे अतोनात हाल झाले. केवळ चार टॅंकरद्वारे संपूर्ण पणजी व आसपासच्या परिसरात पाणीपुरवठा केला जात आहे. याची गंभीर दखल घेऊन आज रात्री विरोधी पक्षनेते तथा पणजीचे आमदार मनोहर पर्रिकर यांनी सांतिनेज येथील सार्वजनिक बांधकाम खात्यावर धडक देऊन मध्यरात्रीपर्यंत जादा टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास संबंधित अधिकाऱ्यांना भाग पाडले. त्यामुळे रात्री मडगाव, म्हापसा व पर्वरी येथून पाणी खात्याद्वारे 16 टॅंकर आणि अन्य खाजगी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला.
दोन दिवसापूर्वी भोम येथे दोन ठिकाणी मुख्य जलवाहिनी फुटल्याने तिची दुरुस्ती करण्यात आली व पाणी सोडण्यात आले. मात्र दोन दिवस ही वाहिनी बंद राहिल्याने त्यात पोकळी निर्माण झाली. आज सकाळी 10 च्या दरम्यान पाणी सोडल्याने दुपारी 3.30 वाजता पुन्हा करमळी येथे जलवाहिनी फुटल्याचे पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंते श्री. चिमुलकर यांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत आवश्यक दुरुस्ती करून उद्या सायंकाळी सात वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे ते म्हणाले.
गेले तीन दिवस पणजी शहरात आणि परिसरात पाणीपुरवठ्यासाठी केवळ चार टॅंकरची सोय केल्यामुळे लोकांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे रात्री श्री. पर्रीकर यांनी याठिकाणी धडक देऊन जादा टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यास भाग पाडले. यावेळी पाणीपुरवठा विभागाने तातडीने जादा टॅंकरची जमवाजमव करून रात्री उशिरापर्यंत पाणीपुरवठा शहरात सुरू ठेवला होता. यावेळी लोकांची ठिकठिकाणी टॅंकरमधून आलेले पाणी घेण्यासाठी झुंबड उडाली होती.
तीन दिवस पाण्याविना काढल्यामुळे आज रात्री सान्तिनेज येथील पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयात रात्री लोकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याठिकाणी श्री. पर्रीकर उपस्थित होते. स्वतः पर्रीकरांनी त्याठिकाणी पाणीपुरवठा करण्याची मागणी घेऊन येणाऱ्या लोकांचे मोबाईल क्रमांक घेऊन त्यांना टॅंकरद्वारे पाणी मिळेल यासाठी व्यवस्था केली. नंतर गर्दी एवढी वाढली की, पोलिसांना पाचारण करावे लागले. पाणीपुरवठा विभागावर रात्री येणारा लोकांचा ओघ पाहून त्याठिकाणी पणजी विभागीय पोलिस उपअधीक्षक देऊ बाणावलीकर, पणजी पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक तुषार लोटलीकर, उपनिरीक्षक प्रज्योत फडते व अन्य पोलिस फौजफाटा दाखल झाला.
आल्तिनो येथे असलेल्या पाण्याच्या टाक्यांत 8 दशलक्ष लीटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. मात्र ओपा येथून गेल्या तीन दिवसांत पाणीपुरवठा न झाल्याने आज या टाक्यातीलही पाणी संपले होते. त्यामुळे पर्वरी येथील टाक्यांतून पाणी टॅंकरद्वारे आणण्यात आले.
येत्या 5 जूनपर्यंत पावसाचे आगमन न झाल्यास राज्यात पाणीटंचाई होण्याची शक्यता जलस्रोत विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.
पाणीपुरवठा खात्यातून मिळालेल्या माहितीप्रमाणे, घरगुती उपयोगासाठी पणजी शहराला रोज 217 दशलक्ष लिटर पाणी लागते. मात्र पाणीपुरवठा खात्याची 394 दशलक्ष लिटर पाण्याची मागणी आहे.

No comments: