Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 26 May, 2008

समाज बांधवांवर अन्याय करू नका - संतोबा देसाई

मराठा समाज संपर्क मेळावा
पणजी, दि. 25 (प्रतिनिधी) ः समाज बांधवांना मदत, सहकार्य करा, त्यांच्यावर कधीही अन्याय करू नका, अशी आर्त साद अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाचे अध्यक्ष संतोबा देसाई यांनी आज पर्वरी येथे आयोजीत केलेल्या संपर्क मेळाव्यात घातली. राज्यात वीस टक्के असलेल्या समाज बांधवांना संघटित करण्याचे काम हाती घेतले असून संपर्क मेळ्यापासून त्याची सुरुवात आहे. सुमारे सहा कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या "मराठा संकुल' या प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण करण्याचा विडा उचलला असून त्यासाठी मदत करण्याचे आवाहन यावेळी श्री. देसाई यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष डॉ. उल्हास परब, डॉ. व्यंकटेश प्रभूदेसाई, सचिव सुभाष फळदेसाई, खजिनदार अरविंद देसाई, सहसचिव प्रदीप देसाई, सभासद विवेक फळदेसाई, शिवाजी देसाई, सुरेश नाईक गांवकर, डॉ. जिबलो गावकर, संजय सावंत देसाई, पुंडलीक प्रभू, ऍड. अर्जुन शेटगावकर, नारायण नाईक, राया एन. नाईक, उदय देसाई व प्रदीप टी. देसाई उपस्थित होते.
यावेळी अनेक समाजबांधवांनी या संकुलाच्या उभारणीला हातभार लावण्यासाठी मदतीची जाहीर घोषणा केली. पर्वरी येथील छत्रपती शिवाजी मंदिरात "संपर्क मेळावा'चे आयोजन करण्यात आले होते.
गोव्याच्या मुक्तीनंतर सर्व समजातील आणि इतर धर्मातील शिकू इच्छिणाऱ्या मुलांसाठी वसतिगृहाची सोय केली होती. आज ती गरज नसली तरी वेगळ्या प्रकारे समजाला मदतीचा हात देण्याची, मार्गदर्शनाची गरज आहे. हे लक्षात घेऊनच समाज संस्थेने "मराठा संकुल'च्या उभारणीचा निर्धार केला आहे, असे श्री. देसाई पुढे बोलताना म्हणाले.
यावेळी या वास्तुशास्त्रज्ञ नंदन सावंत यांनी संगणकाद्वारे या संपूर्ण प्रकल्पाची माहिती करून दिली. या इमारतीत एक हजारापेक्षा जास्त प्रेक्षक बसू शकतील असे वातानुकूलित सभागृह (मराठा संकुल) दुसऱ्या मजल्यावर असेल. तळमजल्यावर संस्थेच्या कार्यालयासाठी तरतूद करण्याबरोबरच वधू वर सूचक केंद्र, व्यवसाय मार्गदर्शन केंद्राचीही सोय आहे. त्याचप्रमाणे भूमीअंतर्गत दोन तळमजले उभारले जाणार आहे. त्याठिकाणी दीडशे वाहने ठेवण्याएवढी जागा असेल, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच या संकुलाची 60 टक्के जागा व्यावसायिक उपयोगासाठी आणून उत्पनाची सोय केली जाणार आहे. तर 40 टक्के जागा समाजाच्या उपयोगासाठी वापरली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
सुरुवातीला प्रतिभावंत गायक प्रवीण गावकर यांच्या सुगम संगीताचा कार्यक्रम झाला. त्यांना तबल्यावर दयानिदेश कोसंबे तर हर्मोनियमवर विठ्ठल खांडोळकर यांनी साथ केली. निवेदन प्रा. अनिल सामंत यांनी केले.
मेळाव्याचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुभाष फळदेसाई यांनी केले.

No comments: