Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 30 May, 2008

गुज्जरांनी केली दिल्ली ठप्प

-आंदोलकांवर अश्रुधुराचा मारा, दगडफेक
-रस्त्यांची नाकेबंदी, चक्काजाम, रेल्वेवाहतूकही ठप्प,
-शांततेसाठी हेलिकॉप्टरमधून टाकली पत्रके
-आंदोलकांनी पत्रके जाळली
-गुज्जरांनी पाळला "हुतात्मा दिन'
-"जयपूर बंद'ला संमिश्र प्रतिसाद
-जळगावमध्येही निदर्शने

नवी दिल्ली, जयपूर, दि. 29 - अनुसूचित जमातीचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी गुज्जरांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा वणवा भडकलेलाच असून दिवसेंदिवस त्याचा आगडोंब वाढतच आहे. हे आंदोलन आता राजस्थानपुरतेच मर्यादित राहिले नसून दिल्ली, पंजाब, हरयाणा, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, जम्मू, श्रीनगर, अहमदाबाद, आदी ठिकाणी ते सुरू झालेले आहे. आंदोलकांनी आज पुकारलेल्या दिल्ली बंद आंदोलनाला हिंसक गालबोट लागले. हिंसक आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर अश्रुधुराचा मारा केला. प्रत्युत्तरादाखल आंदोलकांनीही त्यांच्यावर तुफान दगडफेक केली. "दिल्ली बंद' दरम्यान आंदोलकांनी ठिकठिकाणी रस्त्यांची नाकेबंदी केल्याने वाहतूक ठप्प पडली. आंदोलकांनी अनेक मार्गांवर चक्काजाम केला, धरणे दिले, एवढेच नव्हे तर त्यांनी रेल्वेवाहतूकही रोखून धरली. त्यामुळे वाहतुकीसह रेल्वेसेवाही प्रभावित झाली. आज पुकारलेल्या "जयपूर बंद'ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातील जळगांवमध्येही गुज्जर समुदायातील लोकांनी रस्त्यावर उतरून तीव्र निदर्शने केली. दरम्यान, गुज्जर नेते किरोडीसिंग बैंसला यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गुज्जर समुदायातील लोकांनी आंदोलनात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी "हुतात्मा दिन' पाळला. राजस्थानमध्ये वसुंधरा राजे सरकारने हेलिकॉप्टरमधून शांततेचे आवाहन करणारी पत्रके टाकली. मात्र, गुज्जरांनी ती गोळा करून जाळून टाकली.
दिल्लीत अश्रुधूर, दगडफेक
दक्षिण दिल्लीतील मेहरौली परिसरात गुज्जर आंदोलक रौद्र रूप धारण करीत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्यांना पांगविण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यामुळे संतप्त आंदोलकांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केली.
द्वारका मोड, गाझ्रीपूर, नोएडा मोड, लोनी बॉर्डर, आयानगर या दिल्लीतील अनेक भागांत पोलिस आणि आंदोलक यांच्यात झडप झाली. आंदोलकांनी अनेक ठिकाणी टायर्सची जाळपोळ देखील केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दिल्लीला जोडल्या गेलेल्या सर्वच प्रमुख मार्गांवर वाहतूक अडविल्याने दिल्ली सहा तास ठप्प झाली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत 35 हजार पोलिस जवान तैनात करण्यात आले होते. दिल्ली-नोएडा-दिल्ली द्रुतगती मार्ग, दिल्ली व फरिदाबादला जोडणारा मथुरा रोड, मेहरौली-गुडगांव मार्ग आदी मार्गांवरील वाहतूक आंदोलकांनी ठप्प पाडली.
"दिल्ली बंद'ची हाक "अखिल भारतीय गुज्जर महासभा'ने दिली होती. गेल्या आठवड्यात आंदोलनादरम्यान 39 गुज्जरांचा बळी गेला होता.
राजे सरकारने टाकले हवेतून पत्रक
गुज्जरांना अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी गुज्जरांनी सुरू केलेल्या आंदोलनादरम्यान बळी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गुज्जरांनी आज "हुतात्मा दिन' पाळला व आंदोलन जारीच ठेवण्याचे संकेत दिले. या पार्श्वभूमीवर राजस्थानमधील वसुंधरा राजे सरकारने गुज्जरबहुल परिसरात हेलिकॉप्टरमधून शांतता राखण्याचे आवाहन करणारी पत्रके टाकली. आरक्षणाची मागणी करताना हिंसक मार्गाने जाऊ नका, असे आवाहन त्यांना या पत्रकातून राज्य सरकारने केले आहे.
मुख्यमंत्री राजे यांनी काल प्रमुख वृत्तपत्रांना पूर्ण पानभराच्या जाहिराती देताना गुज्जरांना शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. "आरक्षणाच्या तुमच्या मागण्या तुम्ही केंद्र सरकारकडेच मांडायले पाहिजे. विवेकबुद्धीचा वापर करून तुम्ही प्रक्रिया समजून घ्या व केंद्राकडेच मागणी करा. याविषयीचा निर्णय केंद्रीय स्तरावरूनच व्हायला पाहिजे, अशी समजूत राज्य सरकारने या जाहिरातींमधून काढली होती. आपली हीच बाजू आज पुन्हा एकदा मांडताना राज्य सरकारने भारतीय वायुदलाच्या हेलिकॉप्टरमधून गुज्जर आंदोलकांसाठी शांततेचे आवाहन करणारी पत्रके सोडली. बयाणा, करवाडी या भागात ही पत्रके टाकण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
बयाणा व करवाडी या भागात हवेतून पत्रके टाकून राज्य सरकारने शांतता राखण्याचे जे आवाहन केले ते आंदोलकांनी मोडीत काढले. ही सर्व पत्रके त्यांनी गोळा केली व ती जाळून टाकली. यावेळी गुज्जर आंदोलकांनी मुख्यमंत्री वसुंधरा राजे व राज्य शासन यांच्याविरुद्ध जोरदार नारेबाजी केली.
हुतात्मा दिन पाळला
आंदोलनादरम्यान जे गुज्जर शहीद झालेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी देशभरातील गुज्जर बांधवांनी आज हुतात्मा दिन पाळावा, असे आवाहन गुज्जर नेते किरोडीसिंग बैंसला यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनाला पाठिंबा देत गुज्जरांनी आज ठिकठिकाणी हुतात्मा दिन पाळला.
"जयपूर बंद'ला संमिश्र प्रतिसाद
गुज्जर आंदोलकांनी पुकारलेल्या "जयपूर बंद'ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. आंदोलकांनी अनेक ठिकाणी वाहतूक रोखून धरली. त्यामुळे रस्त्यावरील वर्दळ थंडावली होती. बसेस धावल्या नाहीत परंतु शासकीय कार्यालये तसेच बाजार खुलाच राहिला. अल्वर, बुंंदी, टोंक, नागौर, कोटा आणि दौसा आदी जिल्ह्यांमधून आलेल्या वृत्तानुसार, अनेक ठिकाणी वाहतूक प्रभावित झाली व बऱ्याच ठिकाणी बळजबरीने दुकाने बंद करण्यात आली.

No comments: