Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 26 July, 2011

विश्‍वजितच्या पायाखाली अंधार..

दीपाजी राणे यांचा आरोग्यमंत्र्यांना टोला
वाळपई, दि. २५ (प्रतिनिधी): सत्तरी तालुक्याचा पूर्णपणे कायापालट झाला, असा दावा करून राज्यातील इतर मतदारसंघांतील लोकांना सत्तरीप्रमाणेच विकास करण्याचे आमिष दाखवणारे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे धादांत खोटे बोलत आहेत, असा आसूड सत्तरीचे भाजप नेते दीपाजी राणे यांनी ओढला. पर्ये मतदारसंघातील होंडा, पिसुर्ले भागांत गेल्या तीन महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. सत्तरीचा विकास झाला म्हणणार्‍या आरोग्यमंत्र्यांच्या पायाखाली त्यामुळे अंधारच आहे. विकास झाला, तर मग सत्तरीवासीयांना आजही काळोखात दिवस का काढावे लागतात, असा सवाल त्यांनी केला आहे.
पर्ये मतदारसंघातील होंडा, पिसुर्ले या भागांत विजेचा लपंडाव गेल्या तीन महिन्यांपासून सुरू आहे. लोकांना वीज मिळत नाही मात्र, औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना भरपूर वीज मिळते. खुद्द या भागांतील पंचायत मंडळालाही याची माहिती आहे. ही समस्या सोडवण्यासाठी ते काहीच करीत नाहीत. अखेर ग्रामस्थांवर वाळपई वीजकेंद्रावर धडक मोर्चा नेण्याची वेळ ओढवल्याचे श्री. राणे म्हणाले. सत्तरीतील जनता गेली अनेक वर्षे सत्तेवर असलेल्या राणेंच्या दहशतीखाली आपल्या समस्या व अडचणी व्यक्त करण्याचेही धाडस करीत नाही, अशी परिस्थिती ओढवली आहे. वाळपई वीजकेंद्रात विश्‍वजित राणेंच्या आशीर्वादानेच गेली कित्येक वर्षे ठाण मांडून बसलेले अधिकारी व कर्मचारी जनतेला अजिबात जुमानत नाहीत. होंडातील वीज समस्येबाबत यापूर्वी तक्रार केली असता मुख्य लाइनमध्ये मोठा दोष असल्याचे कारण पुढे केले जात होते. काल मोर्चा नेऊन या अधिकार्‍यांना धारेवर धरले तेव्हा अर्ध्या तासांत वीजपुरवठा सुरळीत झाला, हे कसे काय, असा सवालही श्री. राणे यांनी केला.
फक्त वीज पुरवठा खंडीत होण्याचेच प्रकार येथे वारंवार होतात असे नाही, तर पाणी पुरवठ्याबाबतही अनियमितपणा ही नित्याचीच बात ठरली आहे. होंडा येथील एकाही रस्त्याशेजारी सुयोग्य गटारव्यवस्था नाही. त्यामुळे पावसाचे पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत असते. होंडा सुपाचे पूड नवे दार येथे तर गेली ४० वर्षे मुख्य रस्त्यावर पावसाचे पाणी भरते व मोठा पाऊस येताच हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्ण बंद होतो. गेली अनेक वर्षे सत्तेवर राहिलेले व सात वेळा मुख्यमंत्री झालेले प्रतापसिंह राणे किंवा विकासाच्या बाता मारणारे त्यांचे पुत्र विश्‍वजित राणे यांनी या समस्यांकडे कधीच लक्ष दिलेले नाही. भाड्याचे लोक जमवायचे व मेळावे घेऊन विकासाच्या गोष्टी करायच्या हे आता अति झाले असून वीज, पाणी व रस्ते या लोकांच्या मूलभूत गरजांकडे राणे पितापुत्रांनी लक्ष देण्याची गरज आहे, असे पिसुर्ले पंचायतीचे माजी सरपंच राहिलेले दीपाजी राणे यांनी म्हटले आहे.
गेल्या काही वर्षांत सत्तरीतील सर्वच खात्यातील अधिकारी हे प्रतापसिंह राणे यांचेच नोकर असल्याच्या थाटात वावरतात. त्यांनी दूरध्वनी केला किंवा निरोप पाठवला तर कोणतेही काम चटदिशी होते. मात्र आम आदमीच्या न्याय्य मागण्यांकडे हे अधिकारी नेहमीच दुर्लक्ष करतात. गोव्यात लोकशाही असून लोकांना जे हवे तेच व्हायला हवे. सत्तरी अजूनही अनेक बाबतीत मागासच राहिली आहे. सत्तरीतील अनेक शाळांत गेली कित्येक वर्षे सुमारे ४० शिक्षकांच्या जागा रिकाम्या आहेत. त्यामुळे सरकारी शाळांतील शिक्षणावर ताण पडला आहे. त्याचा थेट परिणाम मुलांच्या अभ्यासावर होत आहे. खुद्द पर्ये मतदार संघातील एका शाळेत एका बाकड्यावर चार मुलांना बसावे लागते, ही परिस्थिती सत्ताधारी राणेंना शोभते काय? सत्तरीचा विकास झाला अशा अफवा पसरवून लोकांची दिशाभूल करणे बंद करून राणे पितापुत्रांनी लोकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे, असा सल्लाही दीपाजी राणे यांनी दिला.
--------------------------------------------------------
‘‘पणजीतील दिवजां, सत्तरीच्या मेणबत्त्या’’
पणजी प्रमाणेच वाळपई शहराचा कायापालट करण्याचा विश्‍वजितचा विचार आहे. पण त्यासाठी नियोजन नसल्याने त्याचा बोजवारा उडाला आहे. सत्तरी तालुक्याच्या प्रवेशव्दारावरील जंक्शनवर पणजीतील दिवजांप्रमाणेच मेणबत्त्यांच्या आकाराचे खांब उभारले आहेत. हे विजेचे खांब गेले तीन महिने लागलेले नाहीत व त्यामुळे त्या केवळ शोभेच्या वस्तू ठरल्या आहेत.