पणजी, दि. २६ (प्रतिनिधी)
राज्यात चोर्या, खून, दरोडे यांचे सत्र सुरूच असून आज अज्ञात चोरट्यांनी बिठ्ठोण येथे मोठा डल्ला मारला. खारीवाडा - बिठ्ठोण येथील गजेंद्र राताबोली यांच्या घरात शिरून चोरट्यांनी २८ लाखांच्या रोकडीसह एकूण ३१ लाख हातोहात पळवले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खारीवाडा - बिठ्ठोण येथील रहिवासी गजेंद्र राताबोली हे नेहमीप्रमाणे आज सकाळी ९.३० वाजता घरातून बाहेर पडले. ते पणजी येथील आयुर्विमा
कार्यालयात काम करतात. राताबोेली यांची मुले सकाळी शाळेला गेली होती. गजेंद्र राताबोली हे दुपारी आपल्या घरी परतले असता त्यांना पुढील दाराची कडी तोडलेली व दरवाजा सताड उघडा असलेला आढळून आला. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता, कपाटात ठेवलेली २८ लाख रुपयांची रोकड, ८३ हजार रुपयाची चिट फंडाची प्रमाणपत्रे व सुमारे २ लाखांचे सोन्याचे दागिने मिळून एकूण ३१ लाख रुपयांची चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. श्री. राताबोली यांनी त्वरित पर्वरी पोलिस स्थानकात या बाबत तक्रार नोंदवली. त्यानुसार, पर्वरी पोलिस निरीक्षक देवेंद्र गाड यांनी घटनास्थळी जाऊन घराची पाहणी केली व अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद केला. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, राज्यात अलीकडे गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना विलक्षण वाढीस लागल्या असून पोलिस खात्यात राजकारण्यांच्या होत असलेल्या हस्तक्षेपामुळे पोलिसांचे मनोबल खच्ची झाले आहे. त्याचाच फायदा चोर उठवत असल्याचे बोलले जात आहे. या आधी शहरी भागातच मोठ्या चोर्या होत होत्या. मात्र पोलिसांना त्यांचा छडा लावण्यात अपयश येत असल्याने आता चोरट्यांनी आपला मोर्चा ग्रामीण भागांकडेही वळवला आहे.
Wednesday 27 July, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment