Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 27 July, 2011

मयेवासीयांचे पारतंत्र्य कधी संपणार?

कॉंग्रेसचे लागेबांधे असल्यानेच प्रश्‍न कायम - अनंत शेट

पणजी, दि. २६ (प्रतिनिधी)
मयेतील स्थलांतरित मालमत्तेच्या वारसदारांचे कॉंग्रेस पक्षातील काही नेत्यांशी घनिष्ठ लागेबांधे आहेत व म्हणूनच हा विषय सोडवण्यात कॉंग्रेस पक्षाला अजिबात रस नाही, असा थेट आरोप मयेचे आमदार अनंत शेट यांनी केला. गोवा मुक्तीच्या पन्नास वर्षांनंतरही मयेवासीयांना पारतंत्र्यातच जगावे लागणे ही गोव्यासाठी अत्यंत शरमेचीच गोष्ट ठरली आहे, असेही ते म्हणाले.
आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर १४ वर्षांनी गोव्याची पोर्तुगीज राजवटीतून मुक्तता झाली. स्वातंत्र्यानंतरही गोव्याला १४ वर्षांचा वनवास का भोगावा लागला, हा प्रश्‍न जसा अनुत्तरित आहे, तसाच प्रकार मये स्थलांतरित मालमत्तेच्या बाबतीतही घडला आहे. आपण गोवा मुक्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. पण या गोव्याचाच एक भाग असलेला मये गाव अजूनही पारतंत्र्यात खितपत का पडला, याचे उत्तर शोधण्याची वेळ आता आली आहे. आत्तापर्यंत सत्तेवर आलेल्या एकाही प्रशासनाला हा विषय सोडवण्यात यश का आले नाही, असे विचारतानाच स्थलांतरित मालमत्तेच्या वारसदारांचे येथील सत्ताधारी नेत्यांशी लागेबांधे असल्याशिवाय हा प्रकार होऊच शकत नाही, असेही ते म्हणाले. पोर्तुगिजांनी राज्यावर साडेचारशे वर्षे राजवट केली तिचा उत्सव इथे साजरा केला जातो. पोर्तुगीज सत्ताधार्‍यांबरोबर पार्ट्या व मेजवान्या झोडल्या जातात. पण मयेचा विषय सोडवण्यासाठी, त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी कुणीच पुढाकार का घेत नाही, याचे उत्तर आपल्याला अजूनही मिळत नसल्याचे आमदार शेट म्हणाले.
गेल्या विधानसभा अधिवेशनात मये स्थलांतरित मालमत्तेच्या इतिहासातील काही महत्त्वाच्या घटनांची माहिती आपण सभागृहाला करून दिली होती. या माहितीची कोणतीच दखल सरकारने घेतली नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. १८१६ साली पोर्तुगीज राज्यकर्त्यांनी मयेतील लोकांकडून ही जमीन हिसकावून घेतली व त्याचा ताबा दायगो दा कॉस्ता दी आंताईद तेयंव याच्याकडे सोपवला. मयेतील हा भाग त्याने तीन पिढ्यांखातर वापरण्याचा करारनामाही करण्यात आला. या महाभागाची तिसरी पिढी १९२९ साली मरण पावली. परंतु, ही जमीन स्थानिक लोकांच्या काही ताब्यात परत आली नाही.
दियागो दा कॉस्ता दी आंताईद तेयंव याने सही केलेल्या करारनाम्यातील टिपणाचा काही भाग आपण सभागृहासमोर ठेवला होता. त्यात २७/०१/१८१७ रोजी झालेल्या करारनाम्यातील मजकुराचाही उल्लेख केला होता. दियागो दा कॉस्ता दि आंताईद तेयंव याला तीन पिढ्यांसाठी दिलेल्या या मालमत्तेबाबत ज्या अटी व घालून दिल्या होत्या त्याची अजिबात पूर्तता झाली नाही. तिसर्‍या पिढीतील वारसदाराने बेकायदेशीररीत्या ही जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला व चुकीच्या पद्धतीने मृत्युपत्र तयार करून घेतल्याचेही या माहितीत उघड होते, असे श्री. शेट म्हणाले. हा प्रश्‍न सोडवण्यासाठी या इतिहासाच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. पण त्यासाठी जबर इच्छाशक्ती हवी. मयेतील स्थलांतरित मालमत्तेचा हा विषय सोडवण्यापेक्षा फक्त या विषयावर जो तो आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचाच प्रयत्न करीत आहे व मयेवासीयांचे हेच दुर्भाग्य आहे, असेही आमदार अनंत शेट म्हणाले.
गोव्यातील समस्त इतिहासकारांनी व कायदेपंडितांनी मयेवासीयांना स्थलांतरित मालमत्तेच्या या संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत करावी, असे आवाहनही आमदार अनंत शेट यांनी केले. मयेतील जनतेने येत्या १५ ऑगस्टपासून मयेचा स्वतंत्र लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे व त्याला आपला पूर्ण पाठिंबा राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले. राज्यात भाजपचे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास हा विषय निश्‍चितपणे सोडवणार असा दृढ विश्‍वासही आमदार अनंत शेट यांनी व्यक्त केला.

1 comment:

cityspidey said...

CitySpidey is India's first and definitive platform for hyper local community news, RWA Management Solutions and Account Billing Software for Housing Societies. We also offer residential soceity news of Noida, Dwarka, Indirapuram, Gurgaon and Faridabad.
You can place advertisement for your business on city spidey.

CitySpidey
Noida Local News
Noida News
Dwarka News
Dwarka Local News
Gurgaon News
Gurgaon Local News
Ghaziabad News
Ghaziabad Local News
Faridabad News
Faridabad Local News
Neighbourhood News
Local News
Noida Society News
Dwarka Society News
Gurgaon Society News
Ghaziabad Society News
Faridabad Society News
Indirapuram Society News
Indirapuram News
Indirapuram Local News
Delhi Local News