Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 28 July, 2011

मिश्रा, हांडे यांना ‘मॅगसेसे’ पुरस्कार

मनिला, दि. २७
जळगावमध्ये महिलांना स्वयंपूर्णतेचा वसा देणार्‍या नीलिमा मिश्रा, तसेच सौरदिव्यांमध्ये क्रातिकारी संशोधन करणारे हरीश हांडे या दोन भारतीयांना ‘आशियाचे नोबेल’ म्हणून ओळखला जाणारा प्रतिष्ठेचा ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील साडेचार हजार लोकवस्तीचे बहादरपूर या गावाचा चेहरामोहराच नीलिमा मिश्रा यांच्या कार्याने बदलला. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवीत नीलिमाताईंनी येथे अक्षरशः क्रांती घडवली.
भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतन संस्था स्थापन करून बहादरपूर येथे २००३ मध्ये पहिला बचत गट स्थापन करण्यात आला. या बचत गटाच्या माध्यमातून गावातील सुमारे ३०० पेक्षा जास्त महिलांना रोजगार मिळाला बचत गटाच्या माध्यमातून केलेल्या कार्याने बचत गट हीच आज बहादरपूरची खरी ओळख बनली आहे. या कार्याचा गौरव करण्यासाठीच रॅमन मॅगसेसे ङ्गाउंडेशनने २०११ च्या पुरस्कारांसाठी त्यांची निवड केली.
सौरदिव्यांमध्ये क्रांती
सौरदिव्यांच्या माध्यमातून सुमारे सव्वालाख घरे उजळणार्‍या हरीश हांडे या ४४ वर्षीय भारतीय अभियंत्यालाही या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ज्या गावात दिव्यांचा प्रकाश पोहोचला नव्हता अशा गरीब गावांमध्ये सौरऊर्जा पोचवण्यासाठी हांडे यांनी स्वतःची सौरऊर्जा कंपनी सुरू केली. त्यामुळे अनेक खेड्यांमध्ये प्रकाशासोबत विकासही पोहोचला.
मिश्रा आणि हांडे यांच्यासह इंडोनेशियाच्या मुंपुनी, कंबोडियाचे कॉल पान्हा, इंडोनेशियाचे हसानेन ज्युईनी आणि ङ्गिलिपिन्सची ऑल्टरनेटिव्ह इंडिजिनिअस डेव्हलपमेंट ङ्गाउंडेशन यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. ३१ ऑगस्ट रोजी मनिला येथे होणार्‍या भव्य सोहळ्यात या विजेत्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख बक्षीस असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. १९५७ मध्ये विमान अपघातात मृत्युमुखी पडलेले ङ्गिलिपाइन्सचे अध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या नावे हा पुरस्कार दिला जातो.

या आधी आचार्य विनोबा भावे, पांडुरंगशास्त्री आठवले, सी. डी. देशमुख, बाबा आमटे, जयप्रकाश नारायण, आर. के. लक्ष्मण, मदर तेरेसा, अरुण शौरी, टी. एन. शेषन, किरण बेदी, जे.एम.लिंगडोह, एम. एस. सुब्बालक्ष्मी, मणीभाई देसाई, एल. सी. जैन, बानू कोयाजी, महेश मेहता, व्ही. शांता, व्हर्गिस कुरिअन, दारा खुर्दोई, त्रिभुवनदास पटेल, कमलादेवी चटोपाध्याय, एम. एस. स्वामिनाथन, इला भट्ट, मेबेल एरोल, रजनीकांत एरोल, प्रमोद सेठी, सी. पी. भट्ट, अरुणा रॉय, राजेंद्र सिग, शांता सिन्हा, प्रकाश-मंदाकिनी आमटे, दीप जोशी, अमिताभ चौधरी, सत्यजित रे, बी. जी. व्हर्गिस, शंभू मित्र, जी. के. घोष, के. वी. सब्बाण, रवी शंकर, महाश्वेतादेवी, पी. साईनाथ, जोकिन आर्पुथम, लक्ष्मीनारायण रामदास, संदीप पांडे, अरविंद केजरीवाल यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

No comments: