Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 26 July, 2011

आलेमावबंधूंना कानपिचक्या!

वालंकाची अपात्रता मागे घेण्यास श्रेष्ठींकडून स्पष्ट नकार
राजीनामा त्वरित मागे घेण्यास फर्मावले

पणजी, दि. २५ (प्रतिनिधी): वालंका आलेमाव अपात्रता प्रकरणी मंत्रिपद व कॉंग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचे नाट्य रचलेल्या चर्चिल व ज्योकीम या आलेमावबंधूंची कॉंग्रेस श्रेष्ठींनी चांगलीच कानउघाडणी केल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. वालंका आलेमाव प्रकरणी पुढील काळात काय तो निर्णय घेऊ; परंतु, तत्पूर्वी ताबडतोब राजीनामा मागे घ्या, असे श्रेष्ठींनी त्यांना सुनावल्याचे कळते.
दरम्यान, या विषयावरून मंत्रिमंडळातील सहकारी व आघाडीतील आमदारांनी सपशेल पाठ फिरवल्याने आलेमावबंधू एकाकी पडले आहेत व त्यामुळेच श्रेष्ठींसमोर बिनशर्त नमते घेण्यावाचून त्यांच्याकडे कोणताही पर्याय राहिलेला नाही. आलेमावबंधू एकाकी पडल्याची संधी साधून वालंका हिची अपात्रता कायम ठेवत युवक कॉंग्रेस निवडणुकाही निश्‍चित कार्यक्रमांनुसारच होणार, असा निर्धारही श्रेष्ठींनी जाहीर केला.
आज संध्याकाळी ७ वाजता गोव्याचे प्रभारी जगमितसिंग ब्रार व श्रीमती सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्याशी आलेमावबंधूंची चर्चा झाली. मंत्रिपद व कॉंग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा सादर करून वालंका हिची अपात्रता मागे घेण्यासाठी श्रेष्ठींना ‘ब्लॅकमेल’ करण्याचा डाव यावेळी उधळून टाकण्यात आला. या बैठकीला खुद्द वालंका आलेमाव या देखील उपस्थित होत्या. वालंकाच्या निवडीसाठी उघडपणे प्रचार करण्यात आल्याने तो निवडणूक आचारसंहितेचा भंग ठरला आहे व त्यामुळेच ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांना श्रेष्ठींकडून सांगण्यात आले. हा अपात्रता निर्णय कोणत्याही परिस्थितीत रद्द करण्यास त्यांनी स्पष्ट नकार दर्शवला. किमान युवक कॉंग्रेस निवडणुका पुढे ढकलाव्यात या मागणीसही श्रेष्ठींनी स्पष्ट नकार दिला. ‘सेव्ह गोवा फ्रंट’ विलीनीकरणावेळी वालंका आलेमाव हिला लोकसभा उमेदवारी देण्याचे ठरले होते. पण त्याची पूर्तता झाली नसल्याची आठवण यावेळी आलेमावबंधूंनी त्यांना करून दिली. मात्र, सध्याच्या परिस्थितीत सरकार सुरळीतपणे चालत असताना अशा धमक्या देऊन अस्थिरता निर्माण करण्याची ते चूक करीत असल्याची जाणीवही त्यांनी करून दिल्याचे सूत्रांकडून कळते.
मुख्यमंत्री परतले
चर्चिल व ज्योकीम आलेमाव यांना दिल्लीत पाचारण केल्यानंतर आज दुपारी मुख्यमंत्री दिगंबर कामत हे मात्र परत गोव्यात आल्याने अनेकांनी आश्‍चर्य व्यक्त केले. आलेमावबंधूंच्या दिल्ली भेटीलाही त्यांनी विशेष महत्त्व दिले नाही. राज्यसभेचे खासदार शांताराम नाईक यांच्याबरोबर आपण दिल्लीत श्रेष्ठींची भेट घेण्यासाठी गेलो होतो, असे ते म्हणाले. आलेमावबंधूंच्या प्रकरणी आपण फोनवरून अहमद पटेल यांच्याशी चर्चा केल्याची माहिती त्यांनी दिली.

No comments: