Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 1 October, 2010

होय, "ती' रामजन्मभूमीच...

लखनौ खंडपीठाचा निसंदिग्ध निर्वाळा

- रामलला, निर्मोही आखाडा, सुन्नी बोर्डाला समान जागा
- रामललाच्या मूर्ती तेथेच राहतील
- तीन महिने "जैसे थे' राखण्याचे आदेश


लखनौ, दि. ३० - अयोध्येतील ज्या जागेचा कालपर्यंत वादग्रस्त वास्तू म्हणून उल्लेख केला जात होता, ती जागा ही रामजन्मभूमीच आहे आणि रामललाच्या मूर्ती तेथेच विराजमान राहतील, असा सुस्पष्ट निर्वाळा अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने दिला आहे.
न्या. एस. यु. खान, न्या. सुधीर अग्रवाल आणि न्या. धर्मवीर शर्मा यांच्या पूर्णपीठाने गुरुवारी, दुपारी ३.३० वाजता हा निकाल न्यायालयात वाचण्यास प्रारंभ केला आणि सुमारे ४० मिनिटे त्यांनी या निकालाचे वाचन केले. त्यानंतर हिंदू महासभेच्या वकिलांनी न्यायालयाबाहेर येऊन पत्रकारांना या निकालाची माहिती दिली. संपूर्ण देशात आणि जगात उत्सुकतेने वाट पाहिली जात असलेला निकाल आज आल्यानंतरच लोकांनी सुटकेचा श्वास सोडला. या याचिकेत जे मुद्दे प्रामुख्याने उपस्थित केले गेले, त्याचा सारांश असलेली आदेशाची प्रत लखनौ खंडपीठाने संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आणि त्यातून सर्व खुलासा झाला.
अयोध्या हे रामाचेच जन्मस्थान आहे, असे न्यायालयाने स्पष्ट करून या अतिशय जुन्या, गुंतागुंतीच्या आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या अशा विषयावर पडदा टाकला आहे. मात्र, असे करत असतानाच न्यायालयाने अयोध्येतील वादग्रस्त जागेचे तीन समान भाग केले असून, एक तृतीयांश जागा हिंदूंच्या, तर एक तृतीयांश जागा मुस्लिमांना दिली आहे. जागेचा तिसरा तुकडा हा रामललाचे जन्मस्थान राहणार आहे.
अतिशय संवेदनशील अशा या खटल्याचा निकाल देताना न्या. एस. यु. खान आणि न्या. सुधीर अग्रवाल यांनी तीन घुमटांपैकी मधले घुमट (जेथे रामललाच्या मूर्ती आहेत) ते हिंदूंचे असल्याचा निर्वाळा दिला आहे. या जागेवर आगामी तीन महिने "जैसे थे'ची स्थिती कायम ठेवण्यात यावी, असे तीनही न्यायमूर्तींच्या पूर्णपीठाने सांगितले आहे. न्या. खान आणि न्या. अग्रवाल यांनी सांगितले की, वादग्रस्त वास्तु असलेली २.७ एकर जमीन तीन समान तुकड्यात वाटण्यात यावी. एक तुकडा निर्मोही आखाड्याला, दुसरा सुन्नी वक्फ बोर्डाला तर तिसरा रामलला विराजमान असलेल्या ट्रस्टला देण्यात यावा. मात्र, तिसरे न्या. धर्मवीर शर्मा यांनी सांगितले की, ही वादग्रस्त जागा प्रभूश्रीरामचंद्रांचे जन्मस्थान आहे आणि मुगल आक्रमक बाबराने तेथे बांधलेली वास्तू ही इस्लामच्या तत्त्वानुसार मशीद होऊच शकत नाही.
न्यायमूर्तींनी दिलेल्या निष्कर्षात न्या. खान यांनी सांगितले की, ही वादग्रस्त जागा मशीद म्हणून बांधण्यात आली होती. ती एकतर बाबराने बांधली असावी वा त्याच्या आदेशाने अन्य कुणीतरी! मात्र, ती जागा बाबराची होती वा ज्याने बांधकाम केले, त्याची होती, हे सिद्ध होऊ शकत नाही. हे बांधकाम करण्यासाठी मंदिर तोडण्यात आले नव्हते. फार पूर्वीच तेथे मंदिराचे अवशेष होते आणि त्यावर ही मशीद बांधण्यात आली.
न्या. अग्रवाल यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, मधल्या घुमटाची जागा ही रामजन्मभूमीच आहे आणि ती हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. तेथे कुणीही अडचणी आणता कामा नये. या जागेवर गेल्या अनेक शतकांपासून हिंदू आणि मुस्लिम अशा दोघांचाही वावर असल्याने ती जागा दोघांचीही आहे.
पहिला संकेत!
लखनौ खंडपीठाचे मुख्य दरवाजे बंद करण्यात आले होते. माध्यमांची गर्दी तेथेच होती. निकालाची प्रत मीडिया सेंटरमध्ये जाईल आणि तेथे निकाल कळेल, अशी अपेक्षा असतानाच हिंदू महासभेच्या वकील रंजना अग्निहोत्री बाहेर आल्या असतानाच त्यांनी विजयी मुद्रेत हात उंचावून दाखविला आणि तेथेच उपस्थितांना, वृत्तवाहिन्यांवरुन निकाल पाहणाऱ्या तमाम देशाला निकालाचा संकेत कळला होता. विजयी मुद्रा आणि त्यांचा हसरा चेहरा निकालाच्या कागदातील ओळी जणू वाचून दाखवित होता.

No comments: