Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 28 September, 2010

अटाला पोलिसांच्या संगनमतानेच पळाला

भाजपचा घणाघाती आरोप

चाड असेल तर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - आर्लेकर



पणजी, दि. २७ (प्रतिनिधी)- गोव्यातून गायब झालेला अटाला इस्राईलला पोहोचल्याची खातरजमा केल्यानंतरच गोवा पोलिसांनी त्याच्या विरोधात "रेड कॉर्नर' व "लुकआऊट' नोटीस जारी केली असावी, असा दाट संशय भाजपने व्यक्त केला आहे. अटाला इस्राईलला पोहोचल्याच्या वृत्ताने पोलिस व गृह खाते पूर्णपणे विवस्त्र बनले आहे. गृहमंत्री रवी नाईक यांना याची जरा जरी चाड असेल तर त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा देणेच योग्य ठरेल, असा टोला भाजप प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर यांनी हाणला.
आज इथे बोलावलेल्या पत्रकार परिषदेत श्री. आर्लेकर बोलत होते. यावेळी मयेचे आमदार अनंत शेट व शिरोड्याचे आमदार महादेव नाईक उपस्थित होते. गोव्याच्या युवा पिढीसाठी संकट बनून राहिलेल्या ड्रग व्यवहार प्रकरणाच्या चौकशीचा "फार्स' सुरू असल्यामुळेच या राज्याची राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनामी झाल्याचे श्री. आर्लेकर म्हणाले. अटाला पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जाणे व आता इस्राईलला पोहोचल्याची वार्ता येऊन धडकणे हा पोलिसांची वर्दी उतरवणारा प्रकार तर ठरला आहेच, पण त्यामुळे आपल्या सुरक्षा यंत्रणेचाही फज्जा उडाला आहे. या एकूण प्रकरणात अटाला याला पोलिसांचीच मदत मिळाली नाही कशावरून, असा सवालही श्री. आर्लेकर यांनी उपस्थित केला. पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी हे फक्त बोलतात, पण त्यांच्याकडून एकही गोष्ट साध्य होत नाही, असा ठपकाही त्यांनी यावेळी ठेवला.
पोलिस व ड्रग माफिया प्रकरणी गृहमंत्री रवी नाईक यांच्या पुत्राचे नाव चर्चेत असल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली पोलिस या प्रकरणाची निःपक्षपाती चौकशीच करू शकत नाहीत. हे प्रकरण "सीबीआय'कडे सोपवणेच योग्य ठरेल, असा पुनरुच्चार श्री. आर्लेकर यांनी केला. "सीआयडी' विभाग हे तर गृहमंत्र्यांच्या हातचे बाहुलेच असल्यागत वावरत आहे. गृहमंत्री या नात्याने संपूर्ण सुरक्षा यंत्रणा आपल्या हातात असताना गृहमंत्री व त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षेची गरज भासावी, याबाबतही श्री. आर्लेकर यांनी आश्चर्य व्यक्त केले. गृहमंत्री व त्यांच्या कुटुंबीयांच्या जिवाला धोका असणे ही खरोखरच गंभीर बाब आहे; तर मग अजूनही पोलिस या प्रकरणाचा छडा का लावत नाहीत, असाही सवाल श्री. आर्लेकर यांनी केला. ही सुरक्षा प्रदान करण्यास भाजपचा अजिबात आक्षेप नाही, पण या सुरक्षेची गरजच का भासावी, याचा खुलासाही गृहमंत्र्यांनी जनतेसमोर करावा, असे आवाहन यावेळी श्री. आर्लेकर यांनी केले.
राज्यात सामान्य नागरिक असुरक्षित आहे हे जगजाहीर आहे. पण आता गृहमंत्री व त्यांचे कुटुंबीयही असुरक्षित बनल्याचेही उघड झाल्याने पोलिस खाते किती निष्क्रिय बनले आहे त्याचीच इथे प्रचिती येते. ड्रग प्रकरणावरून गृहमंत्री रवी नाईक अडचणीत आल्याने आता या प्रकरणावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच तथाकथित "सुपारी' प्रकरणाचा डाव आखला जाण्याचीही शक्यता यावेळी श्री. आर्लेकर यांनी वर्तविली. एकूणच ड्रग प्रकरणावरून गृह खात्याने एवढी पत गमावूनही ते पदत्याग करण्यास राजी होत नसतील तर तो त्यांच्या निर्लज्जपणाचा कळसच म्हणावा लागेल, असा ठोसाही यावेळी श्री. आर्लेकर यांनी लगावला.

No comments: