Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 2 October, 2010

"ऑर्कुट', "फेसबूक'द्वारे "सामान्यां'चा छळ


बंदी घालण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी

पणजी, दि. १ (प्रतिनिधी) - तरुणांमध्ये जबरदस्त आकर्षण असलेल्या "फेसबूक' आणि "ऑर्कुट' या दोन्ही संपर्कमाध्यमांवर (सोशल नेटवर्किंग) बंदी घालण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी केल्याने खळबळ माजली आहे. केंद्र सरकारच्या भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद समितीला सादर करण्यात आलेल्या एका पत्रात मुख्यमंत्र्यांनी "सोशल नेटवर्किंग'द्वारे "सामान्य' लोकांचा नाहक छळ होत असल्याचे म्हटले आहे.
गेल्या महिन्यात राज्याचे शिक्षण मंत्री बाबूश मोन्सेरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांनी, आपल्या नावे कोणीतरी या संपर्क माध्यमांवर बनावट "प्रोफाईल' बनवून बदनामीकारक माहिती प्रसिद्ध केली जात असल्याची पोलिस तक्रार केली होती. मुख्यमंत्री कामत यांनी हे पत्र याच पार्श्वभूमीवर लिहिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
"फेसबूक', "ऑर्कुट' तसेच "हाय ५' या संकेतस्थळांमुळे गोव्यातील लोकांचे जीवन प्रभावित झाले आहे. सद्सदविवेकबुद्धीचा वापर न करता अश्लील, बदनामीकारक, बीभत्स छायाचित्रीकरण या संपर्क माध्यमावर टाकून लोकांना "ब्लॅकमेल' करण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे गोव्यातील सामाजिक रचनेला धोका निर्माण झाला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या समितीला सादर केलेल्या पत्रात नमूद केले आहे.
ओळखीच्या मित्राकडून "इमेल' तसेच "ऍड ऍज फ्रेंड'चे निमंत्रण आल्याने निष्पाप लोक त्यांच्याशी मैत्री करतात. परंतु, प्रत्यक्षात त्या व्यक्तीच्या नावे बनावट खाते उघडण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अनेकांना मनस्ताप सहन करावा लागतो. अनेकांना या संपर्क माध्यमांचा फटका बसला असल्याचे मुख्यमंत्री कामत यांनी पुढे म्हटले आहे.

No comments: