Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 30 September, 2010

आज काय होणार?

सर्वत्र दबलेली उत्सुकता

मडगाव, दि. २९ (प्रतिनिधी) : " उद्या काय होणार.....' आज ज्याच्या-त्याच्या तोंडी हाच सवाल होता, मग ते हॉटेल असो, कार्यालय असो, बसगाडी असो वा सार्वजनिक चौक असो, फार कशाला घराघरांतून , नवरा -बायकोच्या तोंडी देखील हीच चर्चा आणि त्याविषयीचेच सवाल - जबाब होताना दिसले. त्याचबरोबर या सवालांमागे दबलेली भीती, काहीशी उत्सुकता व त्याचबरोबर चिंताही दिसून आली.
अयोध्येतील वादग्रस्त जमिनीच्या मालकी हक्काबाबतचा निवाडा देण्याच्या अलाहबाद उच्च न्यायालयाच्या मार्गांतील सर्व अडथळे सर्वोच्च न्यायालयाच्या कालच्या निर्देशानंतर दूर झाले. त्यामुळे मालकी हक्काबाबतचा निवाडा काय लागणार यापेक्षा त्या निवाड्यानंतर काय होणार यावर सर्वांचे तर्क सुरू झाले आहेत. बहुतेक सर्व वृत्त वाहिन्यांनी तेच तेच रडगाणे लावले आहे. ते करताना लोकांच्या भावनांना खतपाणी घालण्यासारखे कोणतेही वृत्त प्रसारित होऊ नये म्हणून घातलेल्या निर्बंधांकडेही त्यांचे दुर्लक्ष होत असलेले दिसून आले.
केंद्र व राज्य सरकारांनी संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजल्याचे जाहीर केलेले असले व न्यायालयालाही तशी हमी दिलेली असली तरी सरकारच्या उपायावर आणि हमीवर सर्वसामान्यांचा फारसा विश्र्वास नसल्याचेच सामान्यांच्या डोळ्यांत दाटलेली भीती दाखवून देत आहे.
मडगावात खबरदारीपोटी बहुतेक सर्व मुस्लिम धर्मस्थळांवर पोलिस बंदोबस्त ठेवलेला आहे. त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरलेला आहे. दुसरीकडे रुमडामळ दवर्ली येथील समर्थगडावरील २१ दिवसीय गणपतीचे विसर्जन शुक्रवारी १ रोजी होणार असल्याने व मडगावातील ती सर्वांत मोठी विसर्जन मिरवणूक असल्याने ती निर्विघ्न पार पडावी यासाठी पोलिसांची धावपळ सुरू आहे.
या मिरवणुकीबाबत खबरदारीच्या उपायांबाबत चर्चा करण्यासाठी उपजिल्हाधिकारी जॉन्सन फर्नांडिस यांनी आज समर्थगड गणेशोत्सव मंडळ व सर्वधर्मीय प्रतिनिधींची एक बैठक घेतली त्यास मामलेदार परेश फळदेसाई, पोलिस उपअधीक्षक उमेश गावकर व गजानन प्रभुदेसाई, निरीक्षक संतोष देसाई, सिद्धांत शिरोडकर व प्रबोध शिरवईकर उपस्थित होते. समर्थगड मंडळाच्या प्रतिनिधींनी नेहमीच्या मार्गाने विसर्जन मिरवणूक जाईल. तीत साधारण ५ वाहने व पाच हजारांवर भाविक असतील. संपूर्ण शांततेने ती जाईल अशी हमी देतानाच पोलिसांनी पुरेसे संरक्षण द्यावे अशी विनंती केली.
यावेळी सरकारी अधिकाऱ्यांनी कायदा व सुव्यवस्थेचा विचार करून मिरवणूक बाजारानंतर रेल्वे गेटकडे न देता रेसिडेन्सी, लॉयोला हायस्कूल, पेडामार्गे खारेबांधावर न्यावी असा प्रस्ताव मांडला. तथापि, त्यामुळे धार्मिक भावना दुखावण्याची शक्यता आयोजकांनी व्यक्त केली. तरीही उद्याच्या स्थितीचा आढावा घेऊन शुक्रवारी सकाळी एक बैठक पुन्हा बोलवावी व तीत काय तो निर्णय घ्यावा असे ठरले.

No comments: