Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 29 September, 2010

गेली चाळीस वर्षे राणे कुटुंबाने काय केले : पर्रीकर

संतोष हळदणकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल
वाळपई, दि. २८ (प्रतिनिधी): भाजपच्या तीन वर्षांच्या काळात वाळपई मतदारसंघाचा विकास झाला नाही असे जर राणे कुटुंबीय म्हणत असतील तर गेल्या ४० वर्षांत सत्तरी तालुक्यात अनिर्बंध सत्ता उपभोगणाऱ्या राणे कुटुंबीयांनी वाळपईसाठी काय केले, असा बिनतोड सवाल आज विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केला. भाजपचे वाळपई पोटनिवडणुकीसाठीचे उमेदवार संतोषहळदणकर यांनी आज दुपारी ११.४५ वा. आपला उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर श्री. पर्रीकर पत्रकारांशी बोलत होते.
आज सकाळी संतोष हळदणकर यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी राजू गावस यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी आमदार नरहरी हळदणकर, मंडळ अध्यक्ष नारायण गावस, माजी आमदार विनय तेंडुलकर, डॉ. प्रमोद सावंत, वासुदेव परब, प्रा. गोविंद पर्वतकर, अतुल दातये, राजेश गावकर, सखाराम गावकर तसेच असंख्य भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्वप्रथम संतोष हळदणकर व मान्यवरांनी मासोर्डे ग्रामदेवता सातेरी केळबाय, महादेव देवस्थान, हनुमान मंदिर या ठिकाणी जाऊन देवदर्शन घेतले व देवाला गाऱ्हाणे घातले. त्यानंतर हळदणकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
साट्रे पुलाचे काम भाजपच्या कार्यकाळात झाले होते. केवळ जोडरस्ता बांधायचेच शिल्लक राहिले होते. कॉंग्रेस सरकारने उर्वरित काम त्वरित करायला हवे होते. मात्र त्यांनी तसे न करता मुद्दामहून हे काम अर्धवट ठेवले. यालाच राणे कुटुंबीयांनी सत्तरीचा केलेला विकास म्हणावा काय, असा खोचक प्रश्न पुढे बोलताना श्री. पर्रीकर यांनी उपस्थित केला. आजपर्यंत कुमेरी शेतीचा प्रश्न त्यांना सोडवता आलेला नाही. वाळपई इस्पितळाचे इस्राईलीकरण करण्याचा घाट घातला जात आहे. हे सारे धोकादायक असून याचे भविष्यात गंभीर परिणाम लोकांना भोगावे लागू शकतील. राणे कुटुंबीयांनी मतदारसंघाच्या विकासाच्या नावाखाली केवळ स्वतःचाच विकास केला व जनतेला केवळ लाचारच बनवले असा आरोपही पर्रीकर यांनी केला.
यावेळी बोलताना संतोष हळदणकर म्हणाले की, आपण कॉंग्रेसचे आव्हान स्वीकारले असून निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावर ही निवडणूक आपण जिंकणार आहोत. यासाठी घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भाजपचा भर असेल. वाळपई मतदारसंघाला आज अनंत समस्या भेडसावत असून या समस्यांचे निराकरण करण्यास राणे कुटुंबीय असमर्थ ठरले आहेत.

No comments: