Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 30 September, 2010

खाणी कोणाला हव्यात, त्यांची नावे राणेंनी जाहीर करावीत

नरहरी हळदणकर यांचे आव्हान

वाळपई, दि. २९ (विशेष प्रतिनिधी) - वाळपई मतदारसंघ हा निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. अशा ठिकाणी काही नत्द्रष्ट नेते खाणी सुरू करण्याचा कट आखत आहेत. पणजीत पत्रकार परिषदेत बोलताना, लोकांनाच खाणी हव्यात, कारण त्यामुळे संपन्नता येते, असा दावा विश्वजित राणे यांनी केला आहे, त्यामुळे सत्तरीतील मधु कोडा कोण हे उघड झाले आहे. राणेंनी आता कोणाला खाणी हव्या आहेत, त्यांची नावे जाहीर करावीत, असे आव्हान माजी आमदार नरहरी हळदणकर यांनी आज "गोवादूत' शी बोलताना दिले.
यापूर्वी या मतदारसंघात आपण आमदार होतो, अशोक परब, बंडू देसाई व स्वतः विश्वजित राणेंचे वडील व ज्येष्ठ नेते प्रतापसिंग राणे यांना सत्तरीतील लोकांच्या विकासासाठी खाणव्यवसाय सुरू व्हावा असे वाटले नाही. या सर्वांना खाणी नको असताना, विश्वजित राणेंना कोणाच्या विकासासाठी सत्तरीत खाणी आणायच्या आहेत, असा खडा सवाल हळदणकर यांनी केला. सावर्डे येथे खाण सुरू झाल्यास दाबोस प्रकल्पावर दुष्परिणाम होतील, ते पाणी आटले तर विश्वजित मिनरल वॉटर पुरविणार आहेत का? की दुबईहून पाणी आयात करणार आहेत, असा संतप्त सवाल हळदणकर यांनी केला.
गाड्या दारात आल्या की विकास होतो असे राणेंना वाटत असेल, तर त्यांनी पैशांऐवजी गाड्याच वाटाव्यात. गाड्या हे उत्पन्नाचे साधन होत नाही. खाणींमुळे निर्माण होणाऱ्या समस्या जनतेला भविष्यात त्रासदायक ठरणार आहेत, अशी टीका भाजप उमेदवार संतोष हळदणकर यांनी केली. यावेळी बोलताना नरहरी हळदणकर म्हणाले की, आम्ही साट्रे पूल बांधल्यानंतर आता राणेंना रस्ताही बांधता आलेला नाही, मात्र काही रस्ते खाणव्यवसायासाठी बांधले गेले. वाळपई इस्पितळात असलेली डॉक्टर व नर्सची कमतरता राणेंनी अद्याप का दूर केलेली नाही, असा प्रश्न हळदणकर यांनी केला. स्वार्थांसाठी लोकांचे नाव घेणाऱ्या विश्वजितनी सत्तरीवासीयांना गृहीत धरू नये, असे ते म्हणाले.

No comments: