Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 29 September, 2010

गोव्यातही कडक सुरक्षा

पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): श्रीरामजन्मभूमी विषयीचा निकाल येत्या ३० सप्टेंबर रोजी जाहीर होणार असल्याने केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी संपूर्ण देशात "हाय अलर्ट' जारी केला असून त्या पार्श्वभूमीवर गोव्यातही सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक करण्यात आली आहे.
गोव्यातील म्हापसा, फोंडा, मडगाव, वास्को व कुडचडे या संवेदनशील भागांत अतिरिक्त पोलिस फौजफाटा तैनात केला जाणार असल्याची माहिती आज पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी यांनी दिली. त्याचप्रमाणे दोन्ही जिल्ह्यांत जमावबंदी कलम - १४४ लागू करण्यात आले आहे. वाळपई पोटनिवडणुकीमुळे उत्तर गोव्यात या आधीच हे कलम लागू करण्यात आले असून दक्षिण गोव्यात आज रात्रीपासून हे कलम लागू केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, राज्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना धार्मिक सलोखा राखण्यासाठी सर्व धर्मप्रमुखांची एक बैठक घेण्याचे आदेशही मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे, निवाडा कसाही लागला तरी त्याविषयी सरसकट "एसएमएस' पाठवण्यावरही पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

No comments: