Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 17 October, 2010

प्रचार संपला, प्रथमच 'पोल मॅनेजमेंट'चा वापर

वाळपई, दि. १६ (प्रतिनिधी): वाळपई मतदारसंघाच्या १८ रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी प्रचार समाप्त झाला असून यावेळी प्रथमच "पोल मॅनेजमेंट' पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे बोगस मतदानाला आळा बसेल, अशी माहिती निवडणूक अधिकारी जयंत तारी यांनी आज येथे पत्रपरिषदेत दिली. या नव्या पद्धतीअंतर्गत मतदाराचा फोटो काढला जाईल आणि त्याच्या अंगठ्याचा ठसा घेतला जाईल.
पोटनिवडणुकीत १७९२० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात ९१०७ पुरुष व ८८०५ महिला मतदार आहेत. एकूण ३१ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. ज्या मतदान केंद्रांवर एक हजारापेक्षा जास्त मतदार आहेत त्याचे दोन भाग करण्यात आले आहेत. मतदारांना ओळखपत्र सक्तीचे करण्यात आलेले नाही. पासपोर्ट, वाहन परवाना, पॅन कार्ड, पोस्ट कार्यालयातील मुदतठेव पुस्तक, स्वातंत्र्यसैनिक असल्याचे प्रमाणपत्र, पेन्शनची कागदपत्रे, बंदुकीचा परवाना, अपंगत्वाचा दाखला, नोकरीचे कार्ड यापैकी कोणताही दस्तऐवज सोबत आणला तरी त्यास मतदानाची अनुमती दिली जाणार आहे. निवडणुकीसाठी प्रथमच केंद्रीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या दोन तुकड्या दाखल झाल्या आहेत. त्यांना विविध मतदान केंद्रांवर तैनात केले जाईल. त्याखेरीज चारशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात एक मतदान केंद्र अधिकारी, साहाय्यक अधिकारी, खास निरीक्षक आदींचा समावेश आहे. एका अधिकाऱ्याची नेमणूक मतदारांची ओळख पटवण्यासाठी करण्यात आली आहे. काही मतदान केंद्रांसमोर मतदार सुविधा केंद्राची उभारणी केली जाणार आहे. सर्व मतदार केंद्रांवर ध्वनिचित्रमुद्रण केले जाईल. उमेदवार व त्याचा प्रतिनिधी असा दोनच गाड्या वापरता येतील. त्यापेक्षा जास्त गाड्या दिसल्यास त्वरित कारवाई करण्यात येणार आहे. तसेच मतदारांची ने-आण करण्यासाठी गाड्यांचा वापर करता येणार नाही, असेही श्री. तारी यांनी नमूद केले.

No comments: