Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 18 October, 2010

शिवसेना दम देणारी, दम खाणारी नव्हे..

बाळासाहेब ठाकरे गरजले
मुंबई, दि. १७ : शिवसेना ही दम देणारी आहे दम खाणारी नाही. शिवसेनेच्या ढाण्या वाघाचा आवाज ५० डेसिबलच्या आत मावणारा नाही. ब्रह्मदेव जरी आला तरी शिवसैनिकांचा हा आवाज कमी करू शकणार नाही, असे सांगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात आज येथील शिवाजी पार्क मैदानावर विराट जनसमुदायाकडून जबरदस्त टाळ्या घेतल्या. शिवसेनाप्रमुखांनी आपल्या ४५ मिनिटांच्या भाषणात ठाकरे शैलीत सगळ्यांची खरडपट्टी काढली. "युपीए'च्या अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम, मनसेचे प्रमुख राज ठाकरे, मंत्री नारायण राणे यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली.
दसरा मेळाव्यात बाळासाहेब बोलणार म्हणून मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी गर्दी केली होती. ठणठणीत बाळासाहेबांना पाहून जमलेल्या जनसागरात एक नवचैतन्य निर्माण झाले. बाळासाहेब व्यासपीठावर आल्यावर प्रचंड टाळ्या आणि घोषणांनी त्यांचे स्वागत झाले. बाळासाहेबांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ वाहून सभेला सुरूवात केली. यावेळी आदित्य ठाकरे यांना बाळासाहेबांनी तलवार देऊन त्यांच्या युवा सेनेचे उद्घाटन केले. "भावोजी' आदेश बांदेकर यांची शिवसेनेच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आल्याचीही घोषणा यावेळी करण्यात आली.
गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्यावर तोंडसुख घेत बाळासाहेब म्हणाले, त्यांना भगवा दहशतवाद दिसतो. अन्य रंगांचा दहशतवाद दिसत नाही. हिंदूंचा रंग भगवा आहे. शिवरायांच्या झेंड्याचा रंग भगवा आहे. या भगव्याच्या नादाला लागलात तर तुम्हाला परवडणार नाही.
माणिकरावांबद्दल का बोलायचं, चांगले माणिक पैदा झाले आहेत. या गुळगुळीत माणिकरावांच्या टकलावरून घसरून कॉंग्रेसचं सरकार पडतं की नाही ते पहा, असा खुसखुशीत टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
माय नेम इज खान, बिग बॉस या कार्यक्रमांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री संरक्षण देताते. का बिग बॉसमध्ये दोन पाकिस्तानी आणले आहे. भारतात काय गायक, कलाकारांची कमी आहे. कशाला लाचारासारखे जगतात, असा घणाघाणी वार त्यांनी यावेळी केला.
श्रीमती सोनिया गांधीचा समाचार घेताना आपल्या नेहमीच्या शैली बाळासाहेब म्हणाले, मोगलांनी तुमच्यावर २०० वर्ष राज्य केले. ब्रिटिशांनी १५० वर्ष आणि आता इटलीची गुलामी हे कॉंग्रेसचं सरकार करीत आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आम्हीच ठरवणार, असे म्हणणारे कुठे आहेत आणि त्यांचा मुख्यमंत्री कुठे आहे? कल्याण-डोंबिवली महापालिकाचा महापौर आमचाच होणार, अरे बाबा सर्व तुमचच होणार असे म्हटला तर आम्हालाही काही तरी ठेव. ४५ वर्षे आम्हीही काही तरी केलं आहे, असा चिमटा राज ठाकरे यांचं नाव न घेता बाळासाहेबांनी काढला.
शिवसेनेत घराणेशाही बिल्कुल नाही, असे सांगत बाळासाहेब म्हणाले, उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्ष त्या कृष्णकुंजवाल्यांनी केलं. मला समजल्यावर मी भडकलो. मी म्हटलं शिवसैनिकांना विश्वासात घेतल्याशिवाय आणि मी ठरविल्याशिवाय हे होता कामा नये. त्यानंतर शिवसैनिकांनी स्वतः उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्षपदावर नियुक्ती केली, असेही आवर्जुन सांगितले. आमच्याकडे घऱाणेशाही नाही. मंत्र्याचा पोरगा कोणी आमदार होतोय, कोणी खासदार होतोय. कोणी गोळ्या घातलोय, पण या गोळ्या घालणाऱ्यांना क्लीन चीट दिली जाते, तुमच्याकडे किती क्लीन चीट आहे मला सांगा. प्रत्येकाला क्लीन चीट देत बसले आहेत.
अशोकराव मंत्रालयाच्या भिंती काय मजबूत करताहेत, देशाच्या भिंती मजबूत करा. पाकिस्तानी - चिनी देशात घुसताहेत तरी आपण गप्प बसून आहोत, असे म्हणून अशोक चव्हाण यांचाही त्यांनी समाचार घेतला.
काही वृत्तपत्रावर बाळासाहेबांनी एकांगी वृत्त देत असल्याचा आरोप केला. मनसेने ते वृत्तपत्र विकत घेतल्यासारख्या बातम्या त्यात प्रसिद्ध होत आहेत. उद्या त्या वृत्तपत्रात बातम्या येतील बाळासाहेबांची सभेला पूर्वीसारखी गर्दी नव्हती, जोश नव्हता. त्यांना मी एवढचं सांगू इच्छितो, ही पत्रकारिता आम्हालाही जमते, पण ती आम्ही करत नाही.

No comments: