Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 20 October, 2010

सिंधुदुर्गातील खाण परवान्यांचा फेरआढावा घ्या : जयराम रमेश

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सूचना
मुंबई, दि. १९ : निसर्गसंपन्न सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोह व बॉक्साईटच्या खाणींसाठी ४९ लीज परवाने देण्याच्या निर्णयाचा राज्य सरकारने फेरविचार करावा, अशी सूचना केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री जयराम रमेश यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना केली आहे. या ४९ खाणींना जर खरोखरच अनुमती देण्यात आली तर त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वनसंपदा आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होऊ शकतात. ज्या ठिकाणी या खाणी होऊ घातल्या आहेत तेथील स्थानिकांनी यापूर्वीच अशा स्वरूपाचा इशारा दिला आहे. त्यामुळे मंत्री रमेश यांनी या मुद्याची गंभीर दखल घेतली आहे. एकदा का या खाणींचा विषारी विळखा सिंधुदुर्ग जिल्ह्याला पडला की, त्या चक्रव्यूहातून बाहेर पडणे तेथील भूमिपुत्रांना केवळ अशक्य होणार आहे. कारण, खाणींचे मालक जरी आरंभी पर्यावरणाचा तोल सांभाळण्याचे नाटक करून तसे आश्वासन देतात, तरी एकदा खाणीतून प्रचंड पैसा मिळू लागला की, त्यांना या आश्वासनांचा विसर पडतो. वृक्षारोपणासारखे कार्यक्रम फक्त नावापुरतेच केले जातात. अनेकदा जाहिरातींद्वारे अमूक एका क्षेत्रात प्रचंड वृक्षलागवड केल्याचे दावे करण्यात येतात. प्रत्यक्षातील अनुभव मात्र अत्यंत विदारक असतो. शिवाय या खाणींमुळे तेथील लोकवस्त्या जवळपास उद्ध्वस्त होतात. लोकांच्या आरोग्यावर भयंकर परिणाम होतात. पुढच्या पिढ्यांनाही त्याचे भयावह परिणाम सोसावे लागतात. गोव्यात वर्षानुवर्षे हेच चित्र दिसून येत आहे. आता त्या दिशेने सिंधुदुर्गची वाटचाल सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळेच तेथील जनतेत कमालीची अस्वस्थता जाणवू लागली आहे. यातून सुटका होण्यासाठीच सिंधुदुर्गवासीयांनी थेट केंद्र सरकारलाच साकडे घातले आहे.

No comments: