Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 18 October, 2010

विश्वजित धास्तावले, डाव अंगलट येणार?

स्थानिक स्वाभिमान व खाणविरोधी मुद्यांवर आजच्या निवडणुकीचे भवितव्य ठरणार
पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): वाळपईवासीयांना गृहीत धरून आमदारकीचा राजीनामा दिलेले आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना उद्याची पोटनिवडणूक चांगलीच जड जाणार असल्याची चिन्हे दिसत आहे. कारण नसताना लादलेल्या या पोटनिवडणुकीमुळे काहीशा अस्वस्थ बनलेल्या वाळपईच्या जनतेसाठी विश्वजित यांनी विकास हा निवडणुकीचा मुख्य मुद्दा बनवला असला तरी लोकांची पूर्वीप्रमाणे समजूत घालताना त्यांची प्रचंड दमछाक झाल्याचेच यावेळी दिसून आले. त्या पार्श्वभूमीवर उद्या सोमवारी होणारे मतदान महत्त्वाचे ठरणार आहे. कदाचित अतिमहत्त्वाकांक्षीपणा त्यांना महाग पडण्याचीही शक्यता आहे. भाजपने या निवडणुकीत उपस्थित केलेले स्वाभिमानजागृती व निसर्गसंपन्न सत्तरीच्या रक्षणासाठी खाण विरोध हे मुद्दे परिणामकारक ठरू लागल्याचेही प्रचारादरम्यान स्पष्ट झाले. साहजिकच संतोष हळदणकर व विश्वजित यांच्यात रंगणारा हा सामना अत्यंत चुरशीचा होईल, हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
वाळपई मतदारसंघात सुरुवातीला भाजप उमेदवार संतोष हळदणकर यांचा प्रभाव कमी जाणवत होता. मात्र विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर व खासदार श्रीपाद नाईक यांनी प्रचारात हिरिरीने भाग घेतला. घरोघरी प्रचार केला. मतदारांच्या मनावरील दडपण कमी केले. त्यांना निर्भय बनवले. भाजपचे अन्य राज्यस्तरीय नेते दरम्यानच्या काळात अनेक दिवस वाळपईत ठाण मांडून होते. राजकीय दबावाविरोधात स्वाभिमान असा नारा पक्षाकडून दिला गेल्याने कधी नव्हे इतके कार्यकर्तेही सक्रिय झाले होते. त्यातच हळदणकर यांचा साधेपणा आणि स्वच्छ प्रतिमा ही त्यांची जमेची बाजू ठरल्याचेही प्रचारादरम्यान दिसून आले. सत्तरीच्या विनाशाला कारणीभूत ठरणाऱ्या खाणींना विश्र्वजित राणे यांचाच पाठिंबा आहे ही गोष्ट मतदारांच्या मनावर ठसवण्याचा भाजप नेत्यांनी सातत्याने प्रयत्न केला. या उलट विश्वजित या प्रचाराविरोधात ठोस भूमिका घेऊ शकले नाहीत. किंबहुना लोकांना हव्या असतील तर सत्तरीत खाणी येतील वगैरे स्वतःलाच अधिक अडचणीत आणतील अशी विधाने करून ते मोकळे झाले. त्यामुळे प्रस्थापित विश्वजित विरुद्ध साधे आणि सरळमार्गी संतोष हळदणकर असे या निवडणुकीचे स्वरूप बनले आहे.
विश्वजित यांच्यासाठी कॉंग्रेस पक्ष किंवा नेते म्हणावे तेवढ्या ताकदीने प्रचारात उतरल्याचे पाहायला मिळाले नाही. कदाचित आपण एकहाती हा सामना जिंकू, असा अतिआत्मविश्वास त्यांना असावा. आरोग्यमंत्र्यांच्या २०० कोटींच्या विकासातील फोलपणा दाखवून देण्यात भाजप नेते यशस्वी ठरल्याचेही चित्र दरम्यानच्या काळात पाहायला मिळाले. गेली २९ वर्षे हा भाग विकासापासून का मागास राहिला, या कालावधीत मतदारसंघाचा विकास का झाला नाही हे कळीचे मुद्दे भाजपने उपस्थित केले. आहे. विश्वजित भासवतात तो विकास केवळ कागदावरच झाला असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे.
वाळपई मतदारसंघातील नगरगाव, खोतोडे, सावर्डे, गुळेली व भिरोंडा या पंचायतीबरोबरच वाळपई नगरपालिका क्षेत्रातील मतदारांचा कानोसा घेतला असता यापूर्वी राजकारण किंवा निवडणुकीसंदर्भात खुलेआम न बोलणारे मतदार आता उघडपणे आपली प्रतिक्रिया देताना दिसत होते. हळदणकर हे स्थानिक म्हणून ही निवडणूक लढवत असल्याने त्याचाही त्यांना फायदा होईल, असे या लोकांचे म्हणणे पडले. भाजपच्या "स्थानिक उमेदवाराला मतदान करा' या मुद्यालाही लोकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
मतांचा झोका महत्त्वाचा
वाळपई मतदारसंघाच्या या निवडणुकीत १७९१२ जणांना मतदानाचा अधिकार असून २७ केंद्रांत मतदान होईल. २००७ च्या विधानसभा निवडणुकीत विश्वजित यांना ८५९० तर भाजपचे पुती गावकर यांना ५०४१ मते मिळाली होती. या निवडणुकीत खुद्द वाळपई शहराबरोबरच ग्रामीण भागातील मते निर्णायक ठरणार आहेत. प्रामुख्याने विरोधकांचा खाणीचा मुद्दा मतदार किती उचलून धरतात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.
चार केंद्रे संवेदनशील
आजच्या मतदानासाठी १५० जणांना निवडणूक कामासाठी पाठवण्यात आले आहे. कडक बंदोबस्तासाठी ४५० पोलिस आणि "सीआयएसएफ'च्या दोन कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. वापळई मतदारसंघातील केंद्र क्रमांक २, ३, ४ आणि ५ संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. तसेच, कोणत्याही खाजगी वाहनातून मतदारांना मतदान केंद्रावर न आणण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे. त्याचप्रमाणे, मतदान केंद्रात मोबाईलच्या वापरावरही बंदी घालण्यात आली आहे.

No comments: