Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 18 October, 2010

'राष्ट्र भक्कम होण्यासाठी धार्मिक सलोखा महत्त्वाचा'

पद्मश्री मुजफ्फर हुसेन यांचे प्रतिपादन; राष्ट्रहित मंचची दिमाखात स्थापना
म्हापसा, दि. १७ (प्रतिनिधी): सध्याच्या दोलायमान परिस्थितीत आपला देश भक्कम होणे गरजेचे आहे. त्यासाठी धार्मिक सलोखा राखणे सर्वांत महत्त्वाचे ठरावे. हिंदू आणि इस्लामी संस्कृतीत अनेक साम्यस्थळे आहेत. तोच धागा पकडून ही वीण आणखी घट्ट करत नेली तर आपल्या राष्ट्राकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही, असे प्रतिपादन पद्मश्री मुजफ्फर हुसेन यांनी आज येथे केले.
येथील मयुरा हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या एका शानदार कार्यक्रमात "राष्ट्रहित मंच'ची स्थापना करण्यात आली. त्याप्रसंगी श्री. हुसेन बोलत होते. व्यासपीठावर जगन्नाथ उर्फ सद्गुरू मणेरकर, इबादुल्ला खान, नुरुद्दीन खान व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह संजय वालावलकर उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. खास कार्यक्रमास खासदार श्रीपाद नाईक, पर्यटनमंत्री नीळकंठ हळर्णकर, आमदार ऍड. फ्रान्सिस डिसोझा, माजी सभापती सुरेंद्र सिरसाट, संदीप फळारी, मिलिंद अणवेकर, सुधीर कांदोळकर, स्नेहा भोबे, गुरुदास वायंगणकर आणि आजी - माजी नगरसेवक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. हुसेन म्हणाले, राष्ट्रीयताच राष्ट्राचे रक्षण करते. राष्ट्रीयतेचा भार देशाच्या नागरिकांवर आहे. त्यामुळे राष्ट्राच्या ऐक्यासाठी प्रत्येकाने आपल्या मनात आणि काळजात राष्ट्रीयता बाळगली पाहिजे. सध्या पेटत्या मेणबत्या विझवून वाढदिवस साजरा करण्याची प्रथा आहे. याच्या उलट आपल्या संस्कृतीत दीपप्रज्वलन करून नवी प्रभा, नवी ज्योत लावून नवजीवन सुरू केले जाते. हिंदुस्थानची संस्कृती काळोखाकडून प्रकाशाकडे नेणारी आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे या देशात "मनीप्लांट'सारखी संस्कृती रुजत चालली आहे.ती घातक आहे.
त्यापेक्षा घरासमोर तुळस आणि पिंपळाची झाडे लावा. ही वृक्षवल्ली सुरक्षित राहिली तर आपले भवितव्य सुरक्षित होईल.
ते म्हणाले, देश राजकारण्यांच्या कचाट्यात सापडला आहे. मतपेढीची संस्कृती रुजत चालली आहे. हे प्रकार थोपवले पाहिजेत. लोकशाहीच्या वाढीसाठी देशात मतदान सक्तीचे व्हायला पाहिजे. राज्यकर्त्यांनी याचा गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे.
हिंदू आणि मुसलमान हे दोन धर्म हे हिंदुस्थानचे प्रमुख धर्म आहेत. या दोन्ही धर्मांनी एकोपा राखला आहे. त्याद्वारे राष्ट्रीय एकात्मता जोपासायला हवी. कित्येक वर्षे या भूमीत दोन्ही धर्मांचे अनुयायी गुण्यागोविंदाने नांदत आहेत, असे विचार श्री. नुरुद्दीन यांनी मांडले. संजय वालावलकर स्वागतपर भाषणात "राष्ट्रहित मंच' या संघटनेच्या स्थापनेमागील उद्देश व अनुषंगिक माहिती दिली.
व्यासपीठावरील मान्यवरांनी परस्परांना राखी बांधून अनोखे रक्षाबंधन साजरे केले. पद्मश्री हुसेन यांनी खासदार श्रीपाद नाईक यांना राखी बांधून देशाच्या सुरक्षेततेसाठी कटिबद्ध होण्याचे आवाहन केले. सलीम खान यांनी श्री. हुसेन यांचा परिचय करून दिला. जगन्नाथ मणेरकर यांच्या हस्ते श्री. हुसेन यांना भेटवस्तू प्रदान करण्यात आली. प्रा. दिलीप बेतकेकर यांनी सूत्रनिवेदन केले. प्रा. अनिल सामंत यांनी आभार मानले. राष्ट्रीयगीताने कार्यक्रमाची सुरुवात होऊन राष्ट्रीगीताने सांगता झाली.

No comments: