Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 20 October, 2010

नितीशकुमार सर्वांत 'समर्थ' मुख्यमंत्री

अडवाणींनी उधळली स्तुतिसुमने
बिहार विधानसभा निवडणूक

पाटणा, दि. १९ : बिहारला लाभलेला आतापर्यंतचा "सर्वांत समर्थ' मुख्यमंत्री अशी स्तुतिसुमने नितीशकुमार यांच्यावर उधळतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज एका प्रचार रॅलीत "युपीए'च्या अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी आणि पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर टीकेचा भडिमार केला. दरम्यान, आज पहिल्या टप्प्यातील जाहीर प्रचार समाप्त झाला.
बिहारी जनतेनेच नितीशकुमार यांना सर्वाधिक पसंती दिलेली असतानाच नितीशकुमार यांनी केंद्राच्या योजना राज्यात पूर्ण ताकदीनिशी राबवल्या नाहीत, असा आरोप डॉ. सिंग यांनी १६ ऑक्टोबर रोजी सीमाचल येथे केला होता. तसेच बिहारचा जो विकास झाला तो प्रामुख्याने केंद्राच्या विविध योजनांमुळेच, अशी पुस्तीदेखील डॉ. सिंग यांनी जोडली होती. श्रीमती सोनिया गांधी यांनीही पंतप्रधानांच्याच आरोपांची री ओढली होती. त्या आरोपांचा श्री. अडवाणी यांनी चांगलाच समाचार घेतला.
गेल्या पंधरा वर्षांत बिहारमध्ये जंगलराज राबवलेल्या मंडळींना जनता कधीच माफ करणार नाही, असे श्री. अडवाणी यांनी लालूप्रसाद यादव आणि रामविलास पासवान या जोडगोळीचे नाव न घेता सांगितले. कॉंग्रेसचे तर कोठेच नामोनिशाणही दिसून येत नाही. याच्या उलट नितीशकुमार आणि सुशीलकुमार मोदी यांनी बिहारला विकासाच्या एका नव्या वळणावर आणून ठेवले आहे. त्यामुळेच यापूर्वी जातीची समीकरणे मांडणाऱ्या मंडळींना आता विकासाच्या मुद्यावर बोलण्याची पाळी आली आहे, असा त्यांनी शालजोडीतून लगावला.
तसेच लोकसभेच्या निवडणुकांबरोबरच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकाही घेतल्या जाव्यात, या आपल्या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला. त्यामुळे जनतेचे कोट्यवधी रुपये वाचतील आणि हा पैसा विकासाच्या कामांकडे वळवता येईल, असे ते म्हणाले. जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या वादग्रस्त वक्तव्याला श्री. अडवाणी यांनी तीव्र आक्षेप घेतला. "एक देश मे दो विधान, दो प्रधान नही चलेंगे,' असे त्यांनी निक्षून सांगितले. परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांनी ओमर अब्दुल्ला यांच्या विधानांचे समर्थन केल्याबद्दल अडवाणी यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
पहिल्या टप्प्यातील प्रचार संपला
दरम्यान, २४३ विधानसभा जागांपैकी पहिल्या टप्प्यात येत्या २१ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठीचा प्रचार आज समाप्त झाला. या टप्प्यात ४७ जागांकरिता होणाऱ्या निवडणुकीत ६३५ उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत. त्यामध्ये सत्तारुढ जनता दल युनायटेड २६ तर भारतीय जनता पक्ष २१ जागा लढवत आहे. १.०६ कोटी मतदार मतदान करणार असून त्यासाठी १०४५४ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. बिहारमध्ये निवडणुका म्हटल्या की, प्रामुख्याने नक्षल्यांकडून हिंसाचार उफाळतोच. तसा तो यावेळी उफाळू नये यास्तव कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
------------------------------------------
पुन्हा जेडीयु -भाजपच
या निवडणुकीसंबंधी विविध वाहिन्यांनी घेतलेल्या मतदानपूर्व चाचणीत नितीशकुमार यांनाच सर्वोच्च पसंती दिली आहे. बिहारमध्ये पुन्हा "एनडीए'चेच (जेडीयु आणि भाजप) सरकार स्थापन होणार, असा निष्कर्ष या वाहिन्यांनी काढला आहे.

No comments: