Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 22 October, 2010

बिहारमध्ये ५४ टक्के मतदान

पाटणा, दि. २१ : बिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्याचे मतदान आज कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात शांततेत पार पडले. पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीत मतदारांनी उत्साह दाखविल्याने एकूण ५४ टक्के मतदान झाले. मतदानात बाधा टाकण्याच्या किरकोळ घटनांमध्ये एकूण १५० जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
विधानसभेच्या एकूण २४३ जागांपैकी पहिल्या टप्प्यात आज ४७ मतदारसंघांमध्ये मतदान झाले. लोकनिर्वाचित राज्य सरकार निवडून देण्यासाठी जवळपास १.०७ कोटी मतदारांनी आज मतदानाचे कर्तव्य बजावले. चोख सुरक्षा व्यवस्थेत सकाळी ७ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. दुपारी दोन वाजेपर्यंत ३६ टक्के मतदानाची नोंद झाली होती. त्यानंतर मतदारांनी पुन्हा उत्साह दाखविल्याने मतदान केंद्रांसमोर रांगा लागल्या होत्या. दिवसअखेर ५४ टक्के मतदानाची नोंद झाली. पहिल्या टप्प्यात ५४ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगानेही स्पष्ट केले आहे.
मतदानात गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दीडशे जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे. मोटारसायकलसह अनेक वाहने जप्त करण्यात आलेली आहे. मतदानाला मात्र बाधा पोहोचू दिली गेली नाही, अशी माहिती राज्याचे पोलिस महासंचालक नीलमणी यांनी दिली.
माधेपुरा जिल्ह्यातून आलेल्या अधिकृत वृत्तानुसार, स्थानिक लोकांनी आणि बीपीएल कार्डधारकांनी दोन मतदान केंद्रांवर दगडफेक केली. मधुबनी जिल्ह्यातील लौखा येथे मतदान केंद्राबाहेर बॉम्बस्फोट झाला. मात्र, या स्फोटात कोणालाही इजा झाली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

No comments: