Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 17 October, 2010

सत्तरीच्या अस्तित्वासाठी खाणींविरोधात लढणार

विश्वेश परोब यांनी स्थापला
सत्तरी जागृत युवा मोर्चा

पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): शेती, बागायती आणि जलस्त्रोतांनी संपन्न असलेल्या सत्तरीचे काजू हे उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. या निसर्गसंपन्न सत्तरीवर खाणीसारखे संकट आणणाऱ्या राजकारण्यांना व सत्तरीची अस्मिता नष्ट करणाऱ्या खाणींना आपली संस्था प्रखरपणे विरोध करणार असल्याचे प्रतिपादन आज वाळपई येथे पत्रपरिषदेत माजी आमदार अशोक परोब (प्रभू) यांचे पुत्र विश्वेश परोब यांनी केली.
उभरते नेतृत्व म्हणून पुढे येत असलेल्या विश्वेश परोब यांनी सत्तरीची विल्हेवाट लावण्यास कारणीभूत ठरणाऱ्या खाण प्रकल्पांना विरोध करण्यासाठी व सत्तरीतील दबलेल्या लोकांना न्याय देण्यासाठी आज वाळपईत सत्तरी जागृत युवा मोर्चाची स्थापना केल्याची घोषणा केली. यावेळी युवा कार्यकर्ते तथा पत्रकार अविनाश जाधव व इतर नागरिक त्यांच्यासोबत उपस्थित होते.
श्री. परोब म्हणाले, सत्तरीत दबावाचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे अनेकांचा खाणींना व अन्य गैरकृत्यांना विरोध असूनही दबावामुळे ते बोलू शकत नाहीत. आपली संस्था अशा दबलेल्या लोकांचा आवाज बनून त्यांच्या सहकार्याने खाणींविरुद्ध लढणार आहे. पिसुर्ले सारख्या कृषिसंपन्न गावाची खाणींमुळे काय अवस्था झाली आहे त्याचा विचार लोकांनी करावा. खाणींमुळे राजकारण्यांचे व खाणमालकांचे खिसे भरतील; पण त्यामुळे सारी सत्तरी उद्ध्वस्त होईल. त्यासाठी लोकांनी खाणींचे दुप्षरिणाम ओळखून खाणींना विरोध करावा.
त्यांनी सांगितले की, सत्तरीचा नको त्या पद्धतीने विकास होतोय. होंडा येथील बसस्थानक त्याचे चांगले उदाहरण म्हणता येईल. लोकप्रतिनिधींनी लोकांच्या मतांचा सन्मान करावयाचा असतो. त्यांच्यावर दबाव टाकून आपणास हवे ते करून घ्यायचे नसते. काजूच्या बागा, बागायती व शेती तसेच दाबोस येथील पाणीप्रकल्प यांना घातक ठरणाऱ्या खाणी एकदा का वाळपईच्या ग्रामीण भागात घुसल्या की सत्तरीचे सौंदर्य संपलेच म्हणायचे.
खाणींना कुणाचाही पाठिंबा नाही; पण आरोग्यमंत्री खाणींचे समर्थन करतात म्हणून कुणीही जाहीरपणे विरोध करत नाहीत. तथापि, आपली संस्था या सर्व लोकांना खाणींचे दुप्षरिणाम सांगून खाणविरोधी लढ्यासाठी सज्ज करणार आहे. लोकांनी वाळपईतील निसर्गाच्या जतनासाठी, काजूंच्या व कुळागरांच्या तसेच शेतीच्या रक्षणासाठी मोठ्या प्रमाणात मतदान करावे असे ते म्हणाले.
आपली संघटना कुठल्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही. मात्र "खाण समर्थकांना घरी बसवा,' असा प्रचार करणार असल्याचे त्यांनी शेवटी स्पष्ट केले.

No comments: