Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 17 October, 2010

राणे यांनी २९ वर्षांत काय केले याचे उत्तर आधी द्यावे

मगच २९ महिन्यांत आम्ही काय केले ते सांगू : पर्रीकर
वाळपई, दि. १६ (प्रतिनिधी): प्रतापसिंह राणे २९ वर्षे सत्तरीवर सत्ता गाजवत आहेत. असे असूनही विश्वजित राणे यांना सत्तरी मागासलेली वाटत असेल तर त्यांनी २९ वर्षे त्यांचे वडील मंत्री असूनदेखील सत्तरीचा विकास का झाला नाही? विश्वजित यांनी याचे उत्तर आधी भाजपला द्यावे. नंतर आम्ही २९ महिन्यांत कोणता विकास केला हे सांगू, असे सवाल करून विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी विश्वजित राणेंना आज प्रतिआव्हान दिले. वाळपई पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संध्याकाळी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप उमेदवार संतोष हळदणकर खासदार श्रीपाद नाईक, उल्हास अस्नोडकर, गोविंद पर्वतकर, नरहरी हळदणकर, नारायण गावस आदी नेते तसेच प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते
श्री. पर्रीकर म्हणाले, आजपर्यंत आमच्या कार्यकर्त्यांनी योग्य नियोजनाद्वारे प्रचार केला आहे. प्रचार करताना घरोघरी वैयक्तिक संपर्क साधण्यावर जास्त भर दिला.
आज वाळपई मतदारसंघातील लोक निर्भय बनले आहेत. याआधी लोक भीतीपोटी गप्प बसायचे. त्यांना धमकीचे, पैशाचे भय होते. या पोटनिवडणुकीत मात्र तसे नाही. चित्र बदलत चालले आहे. विश्वजित यांनी तरीसुद्धा "अर्थ'पूर्ण व्यवहार सुरूच ठेवले आहेत. जे एकूण स्वयंसाहाय्य गट तयार केले आहेत त्यांना पैसे देऊन लाचार बनविले. हल्लीच खडकी वेळगे येथे पैशांवरून कॉंग्रेसच्या गटांत मारामारी झाली. हे खेदजनक आहे. याला सर्वस्वी विश्वजितच जबाबदार आहेत. याआधी विश्वजित सांगत होते की, भाजपच्या बाहेरील आमदारांनी वाळपईत येऊन प्रचार करू नये. मग असे असताना आज विश्वजित राणे वाळपईतील आहेत काय? ते कोणत्या आधारावर भाजपवर टीका करीत आहे. संतोष हा स्थानिक लोकप्रतिनिधी आहे. म्हणून त्यालाच या मतदारसंघातील समस्या ठाऊक आहेत. जनतेने भाजप उमेदवारालाच निवडून आणावे आणि सत्तरीतील मक्तेदारी मोडीत काढावी.
दाबोस प्रकल्प रस्ते आमच्या काळातील आहेत. विश्वजित यांनी पूल बांधून खाणींची तयारी सुरू केली आहे. वाळपईत हॉस्पिटल पीपीपी तत्त्वावर सुरू करून भंगसाळ करण्याची उपाययोजना त्यांनी केली आहे. १६० खाटांचे हॉस्पिटल बांधून व्यवस्थापन योग्य पद्धतीने होणार काय? विश्वजित हे १८० दिवसांपैकी १२० दिवस परदेशांत होते. त्यांना परदेश दौरे करण्यात रस आहे. दोनापावला बंगल्यावर बसून सहज जिंकून येईन, असे सांगणारे विश्वजित आज सहकुटुंब प्रचार का करीत आहेत, असा खडा सवाल पर्रीकरांनी केला.
आमच्या काळात १४ सरकारी शाळा, पाणी प्रकल्प सुरू झाले. जी कामे अपूर्णच आहेत ती पूर्ण झाली अशा बाता राणेंनी मारू नयेत व स्वतःचा उदोउदो करू घेऊ नये. सावर्डे पंचायतीतील बुद्रुक करमळी येथील ३८.५६५ हे जमीन (सर्व्हे क्र ११/१) राखीव जंगल करण्याचे कारस्थान शिजत असून दि. ३०/९/२०१० रोजी आचारसंहिता असताना तशी नोटीस पंचायतीला आली आहे. त्याची प्रतच पर्रीकरांनी सादर केली. या जमिनीत वनस्पती काजू लागवड केली जाते. त्यामुळे या निवडणुकीनंतर ही ३८ हे जमीन राखीव जंगल होणार आहे. साहजिकच १०० हून अधिक शेतकरी संकटात येणार असल्याची माहिती पर्रीकरांनी यावेळी दिली. ही माहिती विश्वजित यांना नाही काय? डोळे मिटून दूध पिण्याचे काम ते करत आहेत, असा आरोप पर्रीकरांनी केला.
विश्वजित यांना शेतकऱ्यांबद्दल ना सोयर ना सुतक. त्यांनी नोकऱ्या दिल्या त्या स्वीपर, पेशंट ऍटेंडंट अशा स्वरूपाच्या. शिवाय त्याही तात्पुरत्या. सत्तरीत अनेक उच्चशिक्षित आहे त्यांना मोठ्या हुद्याच्या नोकऱ्या का दिल्या नाहीत? आमच्या काळात पोलिस निरीक्षक, मामलेदार अशा नोकऱ्या आम्ही सत्तरीवासीयांना दिल्या. विश्वजित यांना हे जमत नाही काय, असे पर्रीकर शेवटी म्हणाले.
भ्रष्टासुराला खाली खेचा : श्रीपाद नाईक
श्रीपाद नाईक म्हणाले, मी खासदार या नात्याने काहीच केले नाही; फक्त पाट्या लावल्या ,असे कॉंग्रेसकडून सांगितले जात आहे. ते खोटे असून मी विविध २२ प्रकल्प ११ हॉल पर्येत, ५ हॉल वाळपईत, शाळांना मदत अशी अनेक कामे पूर्ण केली आहे. पालहिरवे येथे टेंडर काढलेले असताना विश्वजितांनी हॉलचे बांधकाम बंद करण्यात भाग पाडले. अशा व्यक्तीला पराभूत करण्यातच लोकांचे कल्याण आहे. या पोटनिवडणुकीत सत्तरीवासीयांना भ्रष्टासुराला नव्हे तर भाजपला मते देऊन विजयी करावे.

No comments: