Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 18 October, 2010

भाजप-जेडीयु युती भक्कमच : नितीशकुमार

पाटणा, दि. १७ : कोणी कितीही कोल्हेकुई केली तरी जनता दल युनायटेड आणि भारतीय जनता पक्ष यांची युती भक्कम असल्याचा निर्वाळा आज बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिला. काही प्रसारमाध्यमांनी या दोन्ही पक्षांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाल्याची आवई उठवल्यासंदर्भात नितीशकुमार यांनी हे स्पष्टीकरण दिले.
पत्रकारांशी आज येथे बोलताना नितीशकुमार यांनी सांगितले, जेडीयु आणि भाजप यांच्यात वाद उत्पन्न होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अगदी तळागाळापर्यंत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते उत्साहाने आणि हातात हात गुंफून कार्यरत आहेत. उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी आणि मी स्वतः त्यांना मार्गदर्शन करत आहोत. पहिल्या चार टप्प्यांत एकूण १८२ मतदारसंघांत मतदान होणार असून त्यासाठी केवळ आठ - नऊ दिवस प्रचाराकरिता पुरेसे नाहीत. यास्तव आम्ही प्रचाराचेही सुयोग्य नियोजन केले आहेत. समाधानाची बाब म्हणजे येत्या २० तारखेपासून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि "जेडीयु'चे अध्यक्ष शरद यादव यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील अन्य नेतेही प्रचारात जोमाने भाग घेणार आहेत. बिहार विधानसभेच्या निवडणुकीत लालूप्रसाद यादव आणि रामविलास पासवान यांच्या युतीचे तीनतेरा वाजणार आहेत यात शंकाच नाही. कॉंग्रेसची तर कितव्या क्रमांकावर घसरण होईल हे सांगणेही कठीण आहे.
आम्ही या निवडणुकीत बिहारचा सर्वतोपरी विकास हाच मुख्य मुद्दा बनवला आहे. त्याला बिहारी जनतेकडून उत्तम प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालील वाळू घसरत चालली आहे. आता भाजप व जेडीयु यांच्यात दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या त्यांना पेराव्या लागत आहेत. मतदारांनी यावरूनच काय ते ओळखावे, असा शालजोडीतील "मखमली प्रहार' नितीशकुमार यांनी केला.

No comments: