Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 21 October, 2010

बिहारात आज पहिल्या टप्प्यातील मतदान

लालूंचा 'दुहेरी मुखभंग'
पाटणा, दि. २० : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील ४७ जागांसाठी उद्या गुरुवारी होणाऱ्या मतदानासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रचाराची रणधुमाळी मंगळवार संध्याकाळपासून थंडावली. त्यामुळे उमेदवारांनी दबक्या आवाजात वैयक्तिक पातळीवर कोणताही झेंडा, बॅनरशिवाय दबक्या आवाजात प्रचार सुरूच ठेवला आहे. दरम्यान, राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांना आरंभीच "दुहेरी दणका' बसला आणि त्यांचा दारुण "मुखभंग' झाला.
सरण जिल्ह्यातील सोनेपूर मतदारसंघातून लालूप्रसाद यांची पत्नी राबडीदेवी निवडणूक लढवत असून सिकारपूर येथे लालू व राबडीदेवी यांना हेलिकॉप्टरमधून उतरताच काळे झेंडे दाखवण्यात आले. आम्हाला वीज मिळत नाही, पाणी मिळत नाही, लालू - राबडी चले जाव अशा जोरदार घोषणा तेथे उपस्थित मतदारांनी दिल्या. त्यामुळे हे दोघेही कमालीचे अस्वस्थ झाले. हे कमी म्हणून काय जाहीर सभेसाठी उभारण्यात आलेले व्यासपीठच कोसळले. लालूंबरोबर आपली छबीही झळकावी यासाठी धडपडणाऱ्या राजदच्या उत्साही कार्यकर्त्यांना स्थळ काळाचे भानच उरले नाही. सुदैवाने हे व्यासपीठ कोसळल्याच्या घटनेत कोणालाही इजा झाली नाही. अखेर एक पलंग मागवण्यात आला आणि त्याचा वापर व्यासपीठासारखा करून ही सभा अक्षरशः उरकण्यात आली. "तुम्ही जर मला संधी दिलीत तर मी तुम्हाला वीज आणि पाणी मिळवून देईन', असे आश्वासन लालूप्रसाद यांनी उपस्थित जनतेला दिले. त्याचा त्यांनी वारंवार पुनरुच्चारही केला. मात्र त्यांच्या या भुलभलय्यापासून लोकांनी स्वतःला दूर ठेवणेच पसंत केले. राबडीदेवी राघोपूर मतदारसंघातूनही निवडणूक लढवत आहेत.
यावेळीही मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी (भाजप) या दोन्ही नेत्यांना मतदारांकडून भरभरून पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या गोटात कमालीचा उत्साह दिसून येत आहे. पहिल्या टप्प्यातील ४७ पैकी किमान ३७ जागांवर जदयु आणि भाजपचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास नितीशकुमार व सुशीलकुमार मोदी यांनी व्यक्त केला आहे.
पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय, प्रादेशिक, स्थानिक असे मिळून ४७ पक्ष निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. पहिल्या टप्प्यातील या निवडणुकीत कॉंग्रेसने ४६ जागांवर उमेदवार उभे केलेले आहेत. अपवाद केवळ आलमनगरचा. त्यापाठोपाठ बहुजन समाजवादी पक्ष सर्वाधिक म्हणजे ४५ जागांवर निवडणूक लढवत आहे. बहादूरगंज आणि मनिहारी हे मतदारसंघ त्यांनी वगळले आहेत. पहिल्या टप्प्यात केवळ आठ जागांवर सुरक्षितरित्या निवडणूक लढविली जात आहे. डाव्यांनी ३६ जागांसाठी दावा केला आहे.
बिहारबाहेरील अनेक पक्ष या निवडणुकीत सहभागी झाले आहेत. त्यात झारखंड मुक्ती मोर्चा, जम्मू काश्मीर नॅशनल पॅंथर्स पक्ष, मुस्लिम लीग केरळ स्टेट कमिटी, भारत विकास मोर्चा, शिवसेना, झारखंड दिशोम आदी पक्षांचा समावेश आहे.

No comments: