Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 23 October, 2010

धुवाधार पावसामुळे क्रिकेटप्रेमी धास्तावले

उद्याचा सामना होणार?
पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): फातोर्डा स्टेडियमवर भारत-ऑॅस्ट्रोलियादरम्यान खेळल्या जाणाऱ्या एक दिवसीय क्रिकेट सामन्याला ३८ तास बाकी असताना राज्यात धुवाधार पावसाने हजेरी लावल्याने क्रिकेट प्रेमींना धडकी भरली आहे. दोन्ही संघाचे खेळाडू कालच गोव्यात दाखल झाले आहेत. आज दिवसभर त्यांनी मैदानावर सरावही केला. मात्र, सायंकाळी ७ वाजता पावसाने जोरदार धडक दिल्याने आयोजकांसह सामन्याची तिकीट घेतलेल्या प्रेक्षकांच्या ह्रदयाचे ठोके चुकायला लागले आहेत.
या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत आयोजकांची बैठक सुरू होती. मात्र सामन्याबाबत नेमका कोणता निर्णय घेण्यात आला हे कळू शकले नाही. यावेळी गोवा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तथा आमदार दयानंद नार्वेकर यांच्यासी संपर्क साधला असता "आपल्याला काहीही सांगू शकत नाही' असे उत्तर त्यांनी दिले. परंतु, उद्या दुपारी २ पर्यंत पावसाने आपली उपस्थिती न दाखवल्यास सामना नक्कीच खेळवू असा विश्वास आयोजकांनी बाळगला आहे. दरम्यान, या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याला कोणताही अडथळा येऊ नये यासाठी मडगावचे श्रद्धास्थान असलेले "दामबाब'ला दोनवेळा "गाऱ्हाणे'ही घालण्यात आले आहे.
दुपारपासूनच पावसाचे काळे ढग आकाशात पाहायला मिळत होते. मात्र, सायंकाळी जोरदार गडगडाटासह पावसाने पूर्ण राज्यात हजेरी लावली. अनेक ठिकाणी रस्त्यावर तुडुंब पाणी भरले होते. त्यामुळे रस्त्यावर वाहनेही हाकणे मुश्कील बनले होते. त्यातच रविवारी खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचा आनंद लुटण्यासाठी राज्याबाहेरील तरुणतरुणींचे लोंढे गोव्यात यायला सुरुवात झाली आहे. उद्या शनिवार तसा सुट्टीचाच दिवस असल्याने अनेकांनी आजच गोवा गाठले आहे. आज आणि उद्या गोव्यातील समुद्र किनाऱ्यांचा आनंद लुटून रविवारी सामन्याचा मनमुराद आनंद लुटण्याचा या तरुण क्रिकेटप्रेमींचा बेत आहे.
पावसामुळे आत्तापर्यंत गोव्यात खेळला जाणारा सामान रद्द होण्याचा कटू अनुभव गोमंतकीयांनी घेतला आहे. त्यामुळे यावेळीही असे काही होऊ नये यासाठी अनेकांनी वरुण राजाला साकडे घालण्यास सुरुवात केली आहे. तर, आयोजकांनी "खेळपट्टी'ला कोणतीही हानी होऊ नये यासाठी पूर्ण काळजी घेतली आहे. सायंकाळी पावसाची चाहूल लागताच संपूर्ण खेळपट्टी प्लॅस्टिक आच्छादन टाकून झाकण्यात आली होती.
-----------------------------------------------------------
पणजीत वाहतुकीची कोंडी
दरम्यान पावसामुळे राजधानीत वाहनांची प्रचंड कोंडी झाली होती. ठिकठिकाणी रस्त्यावर पावसाच्या पाण्याचे तळे साचल्याने वाहने हाकणेही मुश्कील बनले होते. पणजी शहरापासून पर्वरी पर्यंत वाहनांची रांग लागली होती. शहरात येणारी पर्यटकांची वाहने आणि सरकारी कार्यालये सुटून शहरातून बाहेर जाणारी वाहने पावसामुळे कोंडीत अडकली.

No comments: