Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 5 March, 2010

कॉंग्रेस पुरस्कृत उमेदवारांना आता घरी बसवा: प्रा. पार्सेकर

पणजी, दि. : राज्यात भ्रष्टाचार, गुन्हेगारी, महागाई, ड्रग माफियांचा सुळसुळाट, बेकायदा खाण व्यवसाय इत्यादी समस्यांनी गंभीर स्वरूप धारण केले असून सध्या गोव्यात चाललेली ही बजबजपुरी थांबवण्यासाठी अशा प्रकरणांत गुंतलेल्या कॉंग्रेस आमदारांनी राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीत पाठिंबा देऊन ठिकठिकाणी उभ्या केलेल्या उमेदवारांना खड्यासारखे वेचून बाहेर काढून टाका, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गोव्यातील सुजाण मतदारांना केले आहे.
राज्यात कॉंग्रेस सरकार सत्तेवर आल्यापासून खून, बलात्कार तसेच दरोडेखोरीचे प्रकार वाढत चालले आहेत. मादक द्रव्य तसेच अमली पदार्थांचा व्यवहार तर राजरोसपणे चालत असून या व्यवसायात सरकारमधील काही व्यक्ती तसेच पोलिस अधिकारीही गुंतले आहेत. त्यांना सरकारचे पाठबळ लाभत असल्यामुळे गोव्यातील कायदा व सुव्यवस्था पार बिघडली आहे. बरेच मंत्री गोव्याचे वाटोळे करून भ्रष्टाचाराच्या मार्गाने पैसा कमावण्यात गुंतले आहेत. बेकायदा खाणींनी तर गोव्याचे अस्तित्वच धोक्यात आणले असून विद्यमान सरकारमधील मंत्र्यांच्या वरदहस्तानेच त्यांना मोकळे रान मिळाले आहे, असा घणाघाती आरोप प्रा. पार्सेकर यांनी केला आहे.
राज्यात महागाईने कळस गाठला असून आम आदमीचे जिणे कठीण होत चालले आहे. महागाईवर नियंत्रण आणण्यास सरकारला पूर्णपणे अपयश आले आहे. अशा परिस्थितीत होत असलेली जिल्हा पंचायत निवडणूक म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या ठरलेल्या पतनाची नांदीच असून या सुवर्णसंधीचा लाभ सुजाण गोमंतकीयांनी घेतलाच पाहिजे असे प्रा. पार्सेकर यांनी म्हटले आहे. या निवडणुकीत कॉंग्रेसच्या भ्रष्ट मंत्री तसेच आमदारांनी उभ्या केलेल्या उमेदवारांच्या विरोधात मतदान करून कॉंग्रेसच्या भ्रष्ट राजवटीला आता जनता कंटाळली आहे असा संदेश त्यांच्यापर्यंत पोचवा. त्यासाठी कॉंग्रेस पुरस्कृत उमेदवारांना खड्यासारखे वेचून बाहेर काढून टाकल्यास गोव्यातील जनतेला भ्रष्ट सत्ता नको हे सिद्ध होईलच शिवाय भाजप सरकारच गोव्याला स्थिर व स्वच्छ प्रशासन देऊ शकते अशी भावना निर्माण होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
या सर्व बाबींचा विचार करून भाजप तसेच भाजपच्या पाठिंब्यावर ठिकठिकाणी उभ्या असलेल्या उमेदवारांनाच प्रचंड बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्षांनी केले आहे.

No comments: