Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 3 March, 2010

...आणि पेडणे पोलिसांनी पत्रादेवी चेकनाका गुंडाळला

पणजी, पेडणे दि. २ (प्रतिनिधी): राज्याच्या सीमांवर असलेल्या पोलिस चेकनाक्यांवर वाहतूकदारांची पोलिसांकडूनच होणारी लुबाडणूक लक्षात घेऊन सरसकट वाहने अडवून तपासणी न करता एखाद्या वाहनासंदर्भात खास माहिती मिळाल्यावर किंवा संशयित वाहनांचीच तपासणी केली जावी, असा स्पष्ट आदेश आज पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी यांनी काढला. परंतु, पत्रादेवी येथे असलेल्या चेकनाक्यांवरील पोलिसांनी या आदेशाचा चुकीचा अर्थ काढत सरळ चेकनाकाच गुंडाळला. ही चूक लक्षात येईपर्यंत तब्बल चार तास पत्रादेवी चेकनाक्यावर कोणत्याही वाहनाची तपासणी झाली नाही. दरम्यान, हा प्रकार लक्षात येताच उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांनी सदर चेकनाका पूर्ववर सुरू करण्याचा त्वरित आदेश दिला.
राज्याच्या सीमांवर असलेल्या चेकनाक्यांवर शेजारील राज्यांतून वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांकडून पैसे आकारून त्यांना प्रवेश दिला जात असे. यातून एका महिन्याला हजारो रुपयांचा गल्ला उभा केला जात होता. अनेक वेळा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या चेकनाक्यांवर छापा टाकून पैसे जप्त केले आहेत. तसेच, काही पोलिस शिपाई आणि हवालदारांनाही निलंबित करण्याची कारवाई केली आहे.
पत्रादेवी चेक नाक्यावरील गोंधळासंदर्भात पेडणे पोलिस निरीक्षक उत्तम राऊत देसाई व उपअधीक्षक सॅमी तावारीस यांना विचारले असता "वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार चेकनाक्यावरील पोलिस हालवण्यात आहे'' असे त्यांनी सांगितले. पत्रादेवी येथील पोलिस चेकनाका दिवसेंदिवस वादग्रस्त ठरत होता.
एकच चर्चा
आज २ मार्च रोजी सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने या चेकनाक्यावर अचानक धाड घालून तपासणी केल्याची चर्चा या भागातून ऐकायला मिळत होती. मात्र अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. या विषयी निरीक्षकांना विचारले असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.
उत्तर गोव्यातील महाराष्ट्रात येण्या-जाण्यासाठी ही प्रमुख गेट आहे. पत्रादेवी येथील मुख्य चेकनाका गेट हटवल्यास भविष्यात बेकायदा कारवाया, दारूची बेकायदा वाहतूक, स्फोटक पदार्थ आदींची वाहतूक बिनधास्त होण्याची शक्यता आहे. दहशतवादी कारवाया करणारे संशयित राज्यात सहज प्रवेश करतील अशी भीतीही व्यक्त होते आहे.
----------------------------------------------------------------
गृहमंत्र्यांनी लक्ष घालावे: बाबू
पंचायतमंत्री बाबू आजगांवकर यांनी याविषयी प्रतिक्रिया देताना गृहमंत्री रवी नाईक यांनी जातीने लक्ष घालून पत्रादेवी नाका पूर्ववत कार्यरत करण्याची मागणी केली. चेकनाका बंद करणे म्हणजे गैर कारवायांना प्रोत्साहन देण्यासारखे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
२ मार्चपासून चेक नाका बंद करण्यापूर्वी मागच्या ३ महिन्यांपासून पत्रादेवी पोलिस चौकीही बंद करण्यात आली होती.

No comments: