Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 3 March, 2010

आता गृहमंत्रालय देणार संगीत पार्ट्यांना परवाने!

पणजी, दि. २ (प्रतिनिधी): राज्यातील किनारपट्टीवर आणि सार्वजनिक ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यासाठी आवश्यक परवाने देण्याचा जिल्हा प्रशासनाचा अधिकार गृहमंत्रालयाने एका आदेशाद्वारे आज काढून घेतला असून यापुढे हे आदेश गृहखात्यातूनच दिले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेल्या या आदेशाचे समर्थन करताना, पार्ट्यांमध्ये सर्रासपणे होत असलेल्या अमली पदार्थांच्या वापराला लगाम घालण्यासाठीच सदर आदेश देण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
पारंपरिक लोकनृत्य आणि महोत्सव तसेच विवाहादी प्रसंगांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. मात्र, संगीत पार्ट्यांसारख्या कार्यक्रमांसाठी आता संबंधितांना गृहमंत्रालयाकडून परवानगी घ्यावी लागणार असल्याचे या आदेशात अवर सचिव सिद्धिविनायक नाईक यांनी म्हटले आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी व अमली पदार्थांच्या वापरावर प्रतिबंध यावा यासाठी सदर आदेश देण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
हे आदेश आत्तापर्यंत अशा कार्यक्रमांना परवानगी देत असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे आता असे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी संबंधितांना थेट गृहमंत्रालयाचा उंबरठा झिजवावा लागणार आहे. राज्य सरकारने हा निर्णय नुकत्याच अमली पदार्थांमुळे घडलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर घेतला आहे. अशा पार्ट्यांना वा कार्यक्रमांना परवानगी जरी उपजिल्हाधिकाऱ्यांकडून दिली जात असली तरी एखादी घटना घडल्यास त्यास विधानसभेत उत्तर देण्याची पाळी गृहमंत्रालयावर येत असे. विरोधी पक्षाने किनारी भागांत वाढत चाललेल्या अमली पदार्थाच्या व्यवसायाविषयी सरकारला वेळोवेळी चांगलेच धारेवर धरले होते. दरम्यान, गृहमंत्रालयाच्या या आदेशामुळे अनेकांची चिरीमिरी बंद होणार असल्याचीही चर्चा आहे.

No comments: