Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 5 March, 2010

कृपालू महाराज आश्रमात चेंगराचेंगरी; ६५ मृत्युमुखी

उत्तरप्रदेशातील प्रतापगढची घटना
प्रतापगढ, दि. ४ : उत्तरप्रदेशातील प्रतापगढ जिल्ह्यातील मानगढस्थित संत कृपालू महाराजांच्या आश्रमात भंडारा सुरू असताना अकस्मात मंदिराचे प्रवेशद्वार आणि मंडप कोसळल्याने काही भाविक दबले गेले व जीव वाचविण्याच्या नादात चेंगराचेंगरी झाली. यामध्ये ६५ भाविकांचा मृत्यू झाला, तर जवळपास चारशे भाविक जखमी झाले आहेत. जखमींमधील शंभर भाविकांची प्रकृती गंभीर आहे. मृतांमध्ये ३७ महिला आणि २६ बालकांचा समावेश आहे. आत्तापर्यंत ४३ मृतांची ओळख पटलेली आहे.
कुंडा मानगढ येथील राम जानकी मंदिरात संत कृपालू महाराजांच्या पत्नीच्या श्राद्धानिमित्त भंडारा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाविकांचा महापूर उसळला होता. जवळपास १३ ते १५ हजार भाविक यावेळी उपस्थित होते. भंडाऱ्यादरम्यान भक्तांना मोफत कपडे आणि भांडी वाटायला सुरुवात होताच, मंदिराच्या प्रवेशद्वारातून एकाच वेळी हजारो भाविक आत शिरले आणि एकच गोंधळ उडाला आणि अकस्मात मंडप आणि प्रवेशद्वार कोसळले. त्याखाली काही जण दबले गेले व चेंगराचेंगरी झाली. यात ६५ जण मृत्युमुखी पडले असून, चारशे जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी शंभर जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर प्रतापगढ आणि अलाहाबादच्या इस्पितळांत उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत ४३ मृतांची ओळख पटली असून मृतांमध्ये महिला आणि बालकांची संख्या मोठी आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
कृपालू महाराजांचा आश्रम पाच ते सात हेक्टर परिसरात पसरलेला असून याठिकाणी नेहमीच भाविकांची मोठी गर्दी उसळलेली असते. चेंगराचेंगरीची घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन भाविकांना सुरक्षित बाहेर काढले, असे सूत्रांनी सांगितले.
भाविकांनी मात्र या दुर्घटनेसाठी कार्यकर्त्यांनाच जबाबदार धरले आहे. अत्यंत ढिसाळ नियोजनामुळे ही चेंगराचेंगरी झाल्याचा त्यांचा आरोप आहे. दरम्यान, स्थानिक पोलिसांनी या संपूर्ण घटनेची चौकशी सुरू केली आहे.

No comments: