Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 28 February, 2010

जनविरोधी संपुआविरूद्ध पेटून उठा!


नितीन गडकरी यांचे आवाहन


अशोक गुप्ता
साकोली, दि. २७ - महागाई आकाशाला भिडली आहे. लोकांना एक वेळचे जेवण मिळत नाही. महागाई, बेकारी यांचे देशात थैमान सुरू आहे. हा जिल्हा धान उत्पादक शेतकऱ्यांचा असून शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित, मच्छिमार, मजूर, शोषित, पीडित हे सर्व कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत. देशातील शेतकरी कर्जात जन्मतो, जगतो व कर्जातच मरतो. त्याची टोपी राष्ट्रीयकृत बॅंकेत व शर्ट भूविकास बॅंकेत गहाण, तर धोतर सावकाराच्या पेढीत बांधलेले आहे. यासाठी कोण जबाबदार, असा प्रश्न उपस्थित करून कॉंग्रेस शासनाच्या चुकीच्या धोरणाची लक्तरे वेशीवर टांगीत, संपुआच्या या जनविरोधी धोरणाविरूद्ध पेटून उठण्याची वेळ आली आहे, असे आवाहन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केले आहे. ते आज येथे होमगार्ड परेड ग्राऊंडवर भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित विशाल विकास परिषदेला संबोधित करीत होते. सभेचे निमंत्रक भाजपा प्रदेश सचिव आ. नाना पटोले होते.
गडकरी पुढे म्हणाले की, ही सर्व कॉंग्रेसच्या ६२ वर्षाच्या कारकीर्दीची देणगी आहे. आजही खेड्यात खाली मान घालून जावे लागते. शेतकरी गरिबीमुळे शौचालयासारख्या आवश्यकतेची पूर्तता करू शकत नाही. शासनाच्या चुकीच्या धोरणाबाबत गहू स्वस्त, ब्रेड महाग, कापूस स्वस्त तर कापड महाग, टमाटर स्वस्त तर सॉस महाग, भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना दोन रु. किलोने भाजीपाला विकावा लागतो, तर तोच खरेदी करताना त्याला २० रु. मोजावे लागतात. शेतकऱ्याच्या गव्हाला शासन ९.५० रु. देण्यास तयार नाही. पण डुक्करही खाणार नाही असा लाल गहू कृषिमंत्री शरद पवार यांनी १९.५० रु. किलोप्रमाणे आयात केला आहे. १२.५० रु. किलोची साखर निर्यात करून ती ३५ रु. किलोने पुन्हा आयात केली आहे. ही कॉंग्रेस व संयुक्त पुरोगामी आघाडीच्या कॉँग्रेस सरकारची उपलब्धी आहे. हे कोणत्या गरिबाचे सरकार आहे, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.
वायदे बाजारामुळे ५ लाख ५० हजार कोटी रु.ची उलाढाल कोणत्याही जिन्नसांचा प्रत्यक्ष व्यापार न होता झालेली आहे. हा सर्व पैसा तुमच्या-आमच्या खिशातून गेल्याचेही त्यांनी जनतेपुढे मांडले. यावेळी शिक्षण क्षेत्रातही चाललेल्या प्रचंड भ्रष्टाचाराकडे त्यांनी लक्ष वेधले. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही केंद्रात भाजपाचे राज्य असताना राबविण्यात आली. ६० हजार कोटीची रक्कम खर्च करून २ लाख १६ हजार गावे डांबरी रस्त्यांनी जोडण्यात आली. हा पैसा इच्छाशक्ती असल्यामुळे उभारण्यात आला होता. भारतीय जनता पार्टी सक्षम असून विदर्भाच्या विकासासाठी दलित, आदिवासी, मच्छिमार, मुसलमान, शेतकरी, शेतमजूर यांच्या पाठीशी समर्थपणे उभी आहे. वैनगंगा साखर कारखाना हा जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. कारखाना दोन लाख लोकांचे जीवन बदलू शकतो. पूर्ती उद्योग समूह नफ्यासाठी नव्हे, तर या क्षेत्राच्या शेतकऱ्यांच्या विकासासाठी आहे. वैनगंगा कारखाना संधी मिळाली तर चालविण्यास तयार आहे, असेही त्यांनी शेवटी सांगितले.
आ. नाना पटोले यांनीही आपल्या भाषणातून अनेक समस्या मांडल्या व शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेची मुहूर्तमेढ येथे रोवण्याचे आवाहन नितीन गडकरी यांना केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष डॉ. प्रकाश मालगावे यांनी, तर संचालन डॉ. युवराज जमईवार यांनी केले. निशाद लांजेवार यांनी आभार मानले.
..........


खाद्यान्न सुरक्षेबाबत अंदाजपत्रकात अन्याय झाला
सुषमा स्वराज यांचा आरोप


नवी दिल्ली, दि. २७ ः देशातील अन्नधान्याची टंचाई दूर करण्याच्या उद्देशाने कृषी उत्पादन वाढवण्यासाठी अंदाजपत्रकात फक्त ४०० कोटी रुपयांची तरतूद करून सरकारने सामान्य जनतेवर मोठा अन्याय केला आहे, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी आज केला आहे.
काल संसदेत सादर करण्यात आलेले अंदाजपत्रक दिशाहिन आणि संवेदनाशून्य आहे, असे स्वराज यांनी फिक्कीच्या ८२ व्या वार्षिक बैठकीत बोलताना सांगितले. कृषी क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी सरकारने अंदाजपत्रकात मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. परंतु त्यांच्या अंमलबजावणीसाठी कुठलाही ठोस कार्यक्रम सरकारने दिलेला नाही. शेतीची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी ४०० कोटी तसेच सिंचनासाठी फक्त ३०० कोटींची तरतूद केली आहे. याबाबत सरकार किती गंभीर आहे हे यावरून सिद्ध होते, असेही त्या म्हणाल्या.

No comments: