Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 9 March, 2008

पाटो कचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित

यशस्वी ठरल्यास इतर पालिकेत सोय
पणजी, दि. 8 (प्रतिनिधी)ः पणजी महानगरपालिकेच्या बहुचर्चित ओला कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे आज नगरविकासमंत्री ज्योकीम आलेमावं यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रकल्पामुळे पणजीकरांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. पण, या प्रकल्पाची सक्षमता येत्या सहा महिन्यांत सिद्ध होईल. त्यानंतरच प्रकल्पाचे भवितव्य ठरणार आहे.
'एनाऍरोबिक डायजेस्टर सिस्टीम' पद्धतीद्वारे बंद टाकीत ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून वीज किंवा गॅस तयार करणाऱ्या पाटो प्लाझा येथील या प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, महापालिकेचे उपमहापौर यतीन पारेख, महापालिकेचे आयुक्त संजीव गडकर, महापालिका प्रशासन संचालक एल्वीस गोम्स, कंपनीचे प्रतिनिधी डॉ. माळे, संचालक एच. बी. सिंग व श्रीमती सिंग आदी उपस्थित होते.
पणजी शहरात दरदिवशी जमा होणाऱ्या दहा टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारा हा प्रकल्प यशस्वी ठरल्यास प्रत्येक पालिका पातळीवर तो राबविण्यात येणार असल्याचे श्री. आलेमाव म्हणाले. या प्रक्रियेमुळे पाटो, मळा व इतर भागांत दुर्गंधी पसरण्याची साशंकता येथील नागरिक उपस्थित करत असल्याचे श्री. पर्रीकर यांनी स्पष्ट केले. सदर प्रकल्प उभारण्यामागील उद्देश साध्य होईल. मात्र, प्रकल्पाच्या देखरेख व सेवेकडे दुर्लक्ष झाल्यास त्याचे विपरीत परिणाम होणार नाहीत, याची काळजी घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच प्रत्यक्षात काम सुरू झाल्यानंतर दुर्गंधी पसरणार नाही, याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त करीत सहा महिन्यानंतरच या प्रकल्पाची क्षमता सिद्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उपमहापौर यतीन पारेख यांनी कचऱ्याची समस्या ही महापालिकेसमोरील सर्वांत मोठी समस्या असल्याचे सांगितले. महापालिकेसाठी सरकारने नियोजित केलेल्या बायंगिणी प्रकल्पाचे काम ताबडतोब मार्गी लावावे, असे आवाहन त्यांनी केले. कंपनीचे प्रतिनिधी डॉ. माळे यांनी हा प्रकल्प नक्कीच यशस्वी होईल, असा दावा केला. दुर्गंधीवर उपाययोजना करण्यात आल्याचे सांगून या प्रकल्पापासून तयार होणारा गॅस किंवा वीज या भागांतील खाजगी वितरकांना देणे शक्य होणार असल्याचे ते म्हणाले. पालिका कामगारांना याप्रकरणी हाताळणीचे पूर्ण प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. खाटीकखाना, मासळीबाजार व भाजीबाजार अशा तीनही ठिकाणचा ओला कचरा दरदिवशी या प्रकल्पात नेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक ऍड. अविनाश भोसले यांनी केले. आभार कंपनीचे संचालक एच. बी. सिंग यांनी व्यक्त केले.

No comments: