Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 9 March, 2008

स्कार्लेटच्या मृत्यूमागे दहशतवादी?

पणजी, दि. 8 (प्रतिनिधी)ः गोव्यातील विदेशी पर्यटक हे आमचे लक्ष्य होते, अशी कबुली गोव्यात घातपात घडवून आणण्याच्या प्रयत्नात असताना अटक केलेल्या दोघा दहशतवाद्यांनी केंद्रीय गुप्तहेर यंत्रणेला दिली आहे. यामुळे स्कार्लेट किलींग या ब्रिटिश युवतीच्या मृत्यू मागे दहशतवाद्यांचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गोव्यात घातपात घडवून आणण्याच्या मार्गावरील एका दहशतवाद्याला कर्नाटक पोलिसांनी नुकतीच अटक केली. या संशयिताने गोव्यातील विदेशी पर्यटकांना आम्ही प्रामुख्याने लक्ष्य बनवले होते, अशी उघड केलेली माहिती किलींगच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी दहशतवादी कारवायांकडे अंगुलिनिर्देश करत आहे.
कर्नाटकच्या गुप्तहेर पोलिसांनी ही माहिती गोवा पोलिसांना दिली असून केंद्रीय गुप्तहेर संस्थेलाही आता आतंकवाद्यांचे कट प्रत्यक्षात उतरत असून गोवा हे दहशतवाद्यांचे मुख्य लक्ष्य असल्याची खात्री पटली आहे. अटकेतील रियाझुद्दीन नासिरने त्याच्या नार्को एनालिसिस चाचणीत काही धक्कादायक माहिती उघड करताना त्याने गोव्यात घातपात घडवून आणण्यासाठी आखण्यात आलेल्या योजनांचा गौप्यस्फोट केला.
एका हॉटेलात स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या नासिरला असदुल्ला नावाच्या दुसऱ्या एका वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यासमवेत वाहन चोरीप्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतरच त्यांच्या दहशतवादी कृत्यांच्या योजना उघड झाल्या होत्या. नार्को चाचणीत नासिरने उघड केलेली माहिती धक्कादायक असून त्याच्या म्हणण्यानुसार ज्या ठिकाणी विदेशी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे, अशा पाच ठिकाणी पाच वाहनाव्दारे गोव्यात स्फोट घडवून आणण्याचा त्यांचा इरादा होता.
या वाहनात आरडीएक्सची स्फोटके पेरून स्फोट घडवून आणायचे व गोव्यातील पर्यटकांना आपले लक्ष्य करताना बॉम्बस्फोट मालिकांव्दारे येथे खळबळ उडवून देण्याची त्यांची योजना होती. नासिरच्या म्हणण्यानुसार, मोठ्या प्रमाणात पर्यटकांची हत्या केल्याने भारत व इतर देशांचे संबंध यात दरी निर्माण झाली असती व व्दिपक्षीय करारांवरही त्याचा बराच परिणाम झाला असता. मात्र, गोव्यातील पर्यटकांच्या संख्येत कमालीची घट झाली असून गोव्याच्या अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम झाला आहे.
गोव्यात सरासरी 2.2 दशलक्ष विदेशी पर्यटक वर्षाकाठी येतात. त्यात प्रामुख्याने ग्रेट ब्रिटनच्या नागरिकांचा अधिकतर भरणा असतो. गोवा पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या एकंदर प्रकरणी ते तपास करीत असून एक अधिकारीही चौकशीच्या निमित्ताने कर्नाटकात जाऊन आला आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे गोव्यातील दहशतवाद्यांचा कट उजेडात आल्यानंतरही अद्याप येथील समुद्र किनाऱ्यावरील सुरक्षा व्यवस्थेत नेहमीप्रमाणेच ढिलाई आहे. आपण एखादी बॅग घेऊन किंवा वाहनातून आरामात आजही मुक्तपणे फिरू शकत नाही. दहशतवाद्यांच्या योजना उजेडात आल्यानंतरही सुरक्षा व्यवस्था सांभाळणारे पोलिस सुस्त आहेत. सार्वजनिक जागेत एखादी संशयित व्यक्ती वावरत असल्यास त्याला जाब विचारणारा कोणीही नाही. याचाच अर्थ दहशतवादी गोव्यात खुलेआम आपल्या योजना यशस्वी करू शकतात. किलींग मृत्यू प्रकरण हे त्यांचीच योजना नसावी कशावरून, असा प्रश्न त्यामुळेच तर निर्माण झाला आहे.

No comments: