Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 9 March, 2008

प्रश्नपत्रिकेबाबतही मनमानी

गोवा शालान्त मंडळाचे अध्यक्ष एल. एम. टी. फर्नांडिस यांनी यंदा दहावी व बारावी परीक्षेत मोठ्याप्रमाणात होणाऱ्या "कॉपी"ला कात्री लावण्यासाठी एकाच विषयाच्या तीन वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देण्याचा एकतर्फी निर्णय घेतल्याची माहिती प्राचार्य मंचतर्फे आज उघड करण्यात आली.
या निर्णयास कोणतीही हरकत नसली तरी अचानक लागू केलेल्या नव्या पद्धतीमुळे विद्यार्थी गोंधळण्याची शक्यता असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शालान्त मंडळ बैठकीतही या निर्णयाबाबत ठोस चर्चा झाली नाही किंवा उच्च माध्यमिक व माध्यमिक विद्यालयांनाही तो कळविण्यात आला नसल्याने परीक्षाकाळात घोळ होण्याचा धोका निर्माण झाल्याचे मत श्री. नाईक यांनी व्यक्त केले आहे.
या नवीन पद्धतीनुसार परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळे प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहेत. यामुळे "कॉपी" करणे किंवा एकमेकांना खुणा करून उत्तरे सांगणे आदी प्रकार बंद होणार असल्याचा श्री. फर्नांडिस यांचा दावा आहे. ही पद्धत सध्या जवाहर नवोदय विद्यालय तसेच महाराष्ट्रातही सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या पद्धतीबाबत हरकत नसली तरी त्याबाबत निदान शिक्षक व विद्यार्थ्यांना पूर्वकल्पना असणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. यंदा पहिल्यांदाच दहावी व बारावी इयत्तेला नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे, त्यात ही नवीन पद्धत त्यामुळे परीक्षाकाळात गोंधळ माजण्याची शक्यता प्राचार्य मंचतर्फे वर्तविण्यात आली आहे.

No comments: