Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 9 March, 2008

वाहतूकदार आपल्या भूमिकेशी ठाम

सोमवारचा लाक्षणिक बंद निश्चित
तिस्क उसगाव, दि. 8 (प्रतिनिधी)ः वेगनियंत्रक यंत्रणेची सक्ती कायमस्वरूपी रद्द करावी, या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अवजड मोटरवाहन महासंघातर्फे सोमवारी दि. 10 मार्च रोजी एक दिवसीय लाक्षणिक बंद आंदोलन होणारच, अशी घोषणा माजी आमदार तथा वाहतूकदार विष्णू रामा नाईक यांनी केली आहे.
वेगनियंत्रक यंत्रणेच्या सक्तीविरोधात विविध वाहतूक संघटनांतर्फे पुकारण्यात आलेला बंद हाणून पाडण्यासाठी सरकारने जोरदार तयारी दर्शवली असताना या संपावरून बसमालक संघटनेत फूट पडल्याचीही चर्चा आहे. आता अ. गो. व्यावसायिक वाहतूकदारांनी या संपातून माघार घेतल्याचे कळवून संपाबाबत अधिकच संभ्रम निर्माण केला आहे. सोमवारी होणाऱ्या संपात प्रवासी बसेस, मालवाहू ट्रक, खनिज वाहू टिप्पर, पिकअप आदी वाहतूकदार सहभागी होणार असल्याची माहिती श्री. नाईक यांनी दिली. आज बाये - सुर्ल येथील सातेरी मंदिराच्या सभागृहात सुमारे 400 वाहतूकदारांच्या सभेत हा निर्णय घोषित करण्यात आला.
महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची भेट घेतली असता, येत्या 12 मार्चपर्यंत थांबा व नंतर आंदोलनाचा निर्णय घ्या, अशी विनंती त्यांनी केली होती, असे सांगण्यात आले. वेगनियंत्रकामुळे वाहनमालकांना सामोरे जावे लागणाऱ्या अनेक दुष्परिणामांची माहिती श्री. नाईक यांनी वाहतूकदारांना कथन केली. राज्यात जास्त अपघात हे नवीनच वाहन शिकलेल्या युवा दुचाकीस्वारांच्या बेदरकार वाहन हाकण्यामुळे होतात, असा दावा यावेळी करण्यात आला. 80 टक्के अपघात हे दुचाकीचे होतात, असे सांगून खनिज माल वाहू टिप्पर ट्रक हे रांगेत हाकावे लागत असल्याने ते गतीने हाकता येत नसल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात सर्व ग्रामीण भागातील खनिज पट्ट्यातील रस्ते हे गेल्या 50 वर्षांपूर्वीचेच आहेत. राज्य सरकारला अवजड वाहनांकडून दर वर्षी 80 कोटी रुपये रस्ताकर प्राप्त होतो. परंतु या भागातील रस्त्यांची सुधारणा व रुंदीकरण मात्र केले जात नाही, असा आरोपही यावेळी करण्यात आला. बस व ट्रक मालकांवर विविध प्रकारच्या करांचा बोजा सरकारकडून लादला जातो. 12 मार्च रोजी उच्च न्यायालयात दाखल झालेल्या यासंदर्भातील याचिकेवरील निकाल घोषित होणार असल्याने त्यानंतर परिषदेतर्फे पुढील कृती ठरविण्यात येईल, असेही श्री. नाईक पुढे म्हणाले.
वेगनियंत्रक यंत्रणेच्या सक्तीविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याची तयारी यावेळी महेश गावस यांनी दर्शवली. बसमालक संघटनेत फूट पडल्याच्या आरोपांचे खंडन करीत सर्व बसमालक संघटना एकत्रित असल्याचा दावा यावेळी करण्यात आला असून त्यांचाही या वेगनियंत्रक सक्तीच्या निर्णयाला ठाम विरोध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, या आंदोलनासंदर्भात विविध आमदारांना देण्यासाठी तयार केलेल्या निवेदनाचे वाचन प्रदीप तिरोडकर यांनी केले. प्रकाश गावस यांचेही यावेळी भाषण झाले. सभेचे सूत्रसंचालन अनिल घाडी यांनी केले.
व्यावसायिक वाहतूकदारांची माघार
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी उपसभापती मावीन गुदीन्हो यांच्या उपस्थितीत वाहतूकदारांशी चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत त्यांनी वेगनियंत्रक सक्तीच्या निर्णयाबाबत सखोल चौकशी केल्याची माहिती अ. गो. व्यावसायिक वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष मान्यूयल रॉड्रिगिस यांनी दिली. मुख्यमंत्री कामत यांनी संघटनेच्या सर्व मागण्या ऐकून घेतल्या. त्यांनी अशाप्रकारे संप पुकारून जनतेची गैरसोय न करण्याची विनंती केल्याने संघटनेतर्फे हा संप पुढे ढकलण्याचा निर्णय झाल्याचे श्री.रॉड्रिगीस म्हणाले. यावेळी गेलेल्या शिष्टमंडळात मॅन्यूयल रॉड्रिगिस, डेरील न्यून्स, निलेश काब्राल, साल्वादोर पॅरेरा, फैजल शेख, ऍडी तावारीस व सत्यवान गावकर यांचा समावेश होता.

No comments: