Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 15 March, 2008

सरकारला धोका नाही : मुख्यमंत्री

पणजी, दि. १५ (प्रतिनिधी): सध्याच्या स्थितीत कोणीही आमदारकीचा राजीनामा देण्याचे धाडस करणार नाही. त्यामुळे विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारला अजिबात धोका नसल्याचा दावा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या गोटातून केला जात आहे.
पांडुरंग मडकईकर यांना डच्चू दिल्यानंतर केंद्रीय समन्वय समितीने मुख्यमंत्र्यांसमोर ठेवलेल्या अन्य दोन मागण्या मंजूर केल्या जाणार नाहीत, असा निर्धार व्यक्त करण्यात येत आहे. केंद्रीय समन्वय समितीच्या आदेशावरून मडकईकर यांना डच्चू देऊन मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर यांना मंत्रिपद बहाल करण्यात आले आहे. त्यामुळे सरकारच्या स्थिरतेवर काही परिणाम होणार काय, असा सवाल केला असता उलट सरकार अधिक स्थिर झाल्याची माहिती या गोटातील नेत्यांनी दिली. सध्याच्या राजकीय परिस्थितीत आपल्या आमदारकीचा राजीनामा बहाल करून नव्याने मतदारांना सामोरे जाण्याची धमक कुणातही राहिली नाही. मडकईकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यास ती त्यांच्यासाठी राजकीय आत्महत्याच ठरेल, असा दावा या नेत्यांनी केला आहे. सध्या आघाडी सरकारची ताकद २६ वर आली आहे. त्यात कॉंग्रेस १८, राष्ट्रवादी-३, मगोप-२, अपक्ष-१ यांच्यासह ताळगावचे आमदार बाबूश मोन्सेरात व सावर्डेचे अनिल साळगावकर यांचाही सरकारला पाठिंबा आहे. विरोधी भाजपकडे केवळ १४ आमदार असल्याने सत्तास्थापनेसाठी त्यांना आणखी ७ आमदारांची गरज भासेल. हा आकडा खूप मोठा आहे. अशावेळी हातचे सोडून पळत्याच्या मागे लागण्याची दुर्बुंद्धी कुणाला सुचली तर ते त्यांचे दुर्भाग्य म्हणावे लागेल, असा दावा करण्यात येत आहे.
दरम्यान, मतदारसंघ फेररचनेमुळेही काही नेत्यांची राजकीय कारकीर्द धोक्यात आली आहे. ही फेररचना नव्या राजकीय समीकरणांसाठी कारणीभूत ठरणारी असल्याने सरकार बरखास्त होणेही काही आमदारांसाठी नुकसानीचे ठरेल. दिगंबर कामत यांनी प्रत्यक्ष घटनेला वेठीस धरून दोन वेळा अवैध्यरीत्या आपले सरकार टिकवले,त्यामुळे येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अपशकून करण्याचा प्रयत्न झाल्यास त्यांच्याकडून विधानसभा बरखास्तीची शिफारस करण्याची शक्यता अधिक असल्याने काहीही संभव आहे, अशी चर्चा आमदारांत आहे. केंद्रीय पातळीवर सध्या मध्यावधी लोकसभा निवडणुकीचे वारे घोंगावते आहे. या काळात गोव्यात काही राजकीय उलथापालथी झाल्यास विधानसभा बरखास्त करून लोकसभा निवडणुकीबरोबर गोव्याच्या विधानसभा निवडणुका घेण्याचा विचारही सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

No comments: