Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 14 March, 2008

आत्महत्या केलेले ते जोडपे आसामचे

मडगाव, दि. १४ (प्रतिनिधी): आसामातील सिलीगुडी येथील सपन व पूनम दत्ता या अवघ्या अकरा महिन्यांपूर्वी विवाहबद्ध झालेल्या जोडप्याने दोन महिनेपर्यंत साऱ्या भारतभर मनसोक्त हिंडून घेतले व शेवटचे दोन दिवस निसर्गरम्य गोव्यात घालवून येथेच आपल्या जीवनाचा शेवट केला .मंगळवारी रावणफोंड येथील हॉटेलात विष घेऊन आत्महत्या केलेल्या जोडप्याची ओळख पटलेली असून ते आसाममधील असल्याचा संदेश तेथील पोलिसांकडून मडगाव पोलिसांकडे येऊन थडकला आहे.
त्यंचे नातेवाईक उद्या संध्याकाळपर्यंत येथे दाखल होतील असा अंदाज आहे.सपन दत्ता व पूनम दत्ता अशी त्यांची नावे आहेत व अकरा महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाल्याची माहिती मिळाली आहे.
शवचिकित्सा करण्यासाठी पोलिस त्यांचे नातेवाईक येण्याची प्रतीक्षा करीत आहेत. ते येथे दाखल झाल्यानंतर रीतसर ओळख पटल्यावर मृतदेह शवचिकित्सेसाठी पाठवले जातील व तो अहवाल मिळाल्यावर ते नातेवाईकांच्या स्वाधीन केले जातील असे सूत्रांनी सांगितले.
पुन्हा शवचिकित्सा टाळण्यासाठी
हणजूण व अन्य काही प्रकरणात नातेवाईकांनी घेतलेल्या हरकतीमुळे दुसऱ्यांदा शवचिकित्सा करण्याचे जे प्रकार घडले तसे या प्रकरणातही होऊ नये म्हणून ही खबरदारी घेतली गेलेली आहे. पोलिसांनी ओळख पटविण्यासाठी देशव्यापी संपर्क साधला होता व त्यांतून ही माहिती मिळाली परंतु अधिक तपशील नातेवाईक येथे दाखल झाल्यावरच मिळेल असे निरीक्षक संतोष देसाई यांनी सांगितले. उभयतांनी हॉटेल रजिस्टरवर दत्ता असे आडनाव दिले होते पण पत्ता कोलकोता असा दिला होता . पोलिसांनी त्या पत्त्यावर संपर्क साधला होता पण काहीच उपयोग झाला नव्हता.त्यांच्या बॅगेत पणजीतील हॉटेल नेपच्यूनची जी तिकिटे सापडली त्यावरून पोलिसांनी नेपच्यून हॉटेलात संपर्क साधला असता तेथे त्यांची खरी नावे व पत्ता सापडला व त्या आधारे आसाम पोलिसांशी संपर्क साधल्यावर सारे दुवे जुळून आलेे.
मिळालेल्या माहितीनुसार सपनचा पूनमशी अकरा महिन्यांपूर्वी विवाह झाला होता व वैवाहिक जीवन सुरळीत चाललेले असतानाच साधारण तीन महिन्यांपूर्वी सिलीगुडी येथील त्याच्या चांगल्या चालणाऱ्या कॉझमेटीक्सच्या दुकानाला अकस्मात आग लागली व ते संपूर्ण खाक झाले .या प्रकाराने सैरभैर झालेल्या सपनने हाय खाल्ली व काही दिवस तेथे थांबून तो पत्नीला घेऊन घरांतून बेपत्ता झाला. घरच्या लोकांनी त्याच्या शोधाचे अनेक प्रयत्न करूनही काहीच उपयोग झाला नव्हता.दोन महिने इतस्ततः भटकूनही चित्त स्थिर न झालेल्या त्याने आपल्या पत्नीसह गोव्यात येऊन जीवनाचा शेवट केलेला असावा.

No comments: