पणजी, दि. १४ (प्रतिनिधी): गुणवाढ प्रकरणात गुंतलेले गोवा शालान्त मंडळाचे अध्यक्ष एल.एम.टी.फर्नांडिस यांनी केलेल्या तथाकथित गैरप्रचारामुळे आज कार्यकारी मंडळाच्या बैठकीत फर्नांडिस यांना बरेच धारेवर धरण्यात आले. यावेळी त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. त्यांनी केलेल्या गैरप्रकाराचा यावेळी खुलासा करण्याची मागणी केल्यानंतर ते कोणत्याही प्रश्नाला उत्तर देऊ शकले नाहीत. यावेळी त्यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आपण त्यावर काहीच बोलू शकत नसल्याचे सांगितले. परंतु यावेळी हे प्रकरण कोणत्या न्यायालयात आहे, असा प्रश्न केल्यानंतर त्यांनी सदर विद्यार्थ्याने ग्राहक मंचात धाव घेतल्याची माहिती त्यांनी दिली. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या एका निवाड्यानुसार शिक्षण क्षेत्रातील कोणतेही गैरप्रकार ग्राहक मंचात जाऊ शकत नसल्याचे म्हटले आहे. ही बाब यावेळी उपस्थित सदस्यांनी निदर्शनास आणून दिली.
हा प्रश्न विद्यार्थ्याच्या भविष्याचा असल्याने प्राचार्य संघटना सुरू होणाऱ्या परीक्षेवर कोणताही परिणाम होईल अशी कृती करणार नसल्याचे नारायण देसाई यांनी म्हटले आहे. मात्र सोमवारपर्यंत यावर तोडगा काढला नसल्यास दहावी तसेच बारावी विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकांना हातही लावणार नसल्याचा इशारा पुन्हा एकदा दिला आहे. त्यामुळे होणाऱ्या परिणामांना पूर्णपणे शिक्षण मंत्री जबाबदार असणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
गेल्या सात महिन्यांत या प्रकरणावर तोडगा काढण्यात मुख्यमंत्री दिगंबर कामत व शिक्षण सचिवांना अपयश आल्याने त्यांच्यावरील विश्वास उडाल्याचे ते यावेळी म्हणाले.
मंडळाचे अध्यक्ष फर्नांडिस यांना निलंबित करून त्यांनी केलेल्या गैरप्रकारांची व मंडळात केलेल्या गैरकृत्यांची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी कायम असल्याचे श्री. देसाई सांगितले. तसेच गुणवाढ प्रकरण पालकांना गंभीर दिसत असल्यास त्यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन उच्च माध्यमिक प्राचार्य संघटनेचे केले आहे.
Friday 14 March, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment